scorecardresearch

“…म्हणून देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती”, भास्कर जाधवांचं विधान

“…ही भाजपाची जुनी सवय आणि खोड आहे”

Bhaskar jadhav devendra fadnavis
आमदार भास्कर जाधव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महाविकास आघाडी सरकारने भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. आपल्याला कारागृहात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण, ते काही करु शकले नाहीत. ज्यांना ही जबाबदारी दिली, तेच कारागृहात गेले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला होता. याला आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यांशी बोलत होते.

फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “त्यांच्या विधानाला फार महत्व देण्याची गरज नाही. पण, कुठंतरी काहीतरी घडलं असावं, म्हणून फडणवीसांच्या मनात अटक होण्याची भिती निर्माण झाली आहे. फडणवीसांनी काही चूक किंवा गुन्हा केला आहे का? फडणवीसांच्या अटकेची कुठेही चर्चा नाही. फडणवीसांनीच मुद्दा उपस्थित केल्याने, काय खरं काय खोटं हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे.”

हेही वाचा : “…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले…

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपाने महाविजय २०२४ अभियान शनिवारी जाहीर केलं. यावर भास्कर जाधव यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं, “समाजात वेगवेगळे आकडे फेकून संभ्रम निर्माण करायचं हे भाजपाचं नियोजन आहे. आमच्या पक्षाशिवाय कोणीची नाही, असं वातावरण निर्माण करतात. ही भाजपाची जुनी सवय आणि खोड आहे. एवढीच हिंमत असेल तर मुंबई, ठाणे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊन दाखवाव्यात. त्यांचं पानीपत ठरलं आहे,” असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 16:32 IST