शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी गोरेगाव मधील महायुतीच्या मेळाव्यात बोलत असताना भाजपावर शरसंधान साधले. भाजपाने ४०० पार जाण्याऐवजी संपूर्ण संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्रपक्ष आणि विरोधकांना अडचणीत आणू नये, असे विधान केले होत. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली. तसेच आपला मुलगा अमोल किर्तीकर याला ईडीकडून नाहक त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. किर्तीकर यांच्या आरोपावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

गजानन किर्तीकर यांच्या उपरोधिक टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “आमच्यापेक्षा काँग्रेसच्या काळात ईडीच्या सर्वाधिक कारवाया झाल्या होत्या. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना अशा अनेक कारवाया झाल्या होत्या. केंद्रीय यंत्रणाकडून होणारी कारवाई भाजपा करत नाही. प्राप्तिकर विभागाला एखाद्याच्या उत्पन्नात कमी-अधिक प्रमाण आढळले तर त्यावर चौकशी होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्याही चौकशा झालेल्या आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीत पंतप्रदान नरेंद्र मोदी किंवा एखादा पक्ष सामील नसतो.”

‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नाचे उत्तर देत असताना थेट शिंदे गटाचे खासदारांचे नाव घेणे टाळले. तसेच त्यांनी अमोल किर्तीकर यांच्यावरील कारवाईबाबत भाष्य केले नाही.

गजानन किर्तीकर काय म्हणाले होते?

गजानन किर्तीकर प्रचारसभेत बोलताना म्हणाले, “शिवसेनेत मला ५७ वर्ष झाली. पण मी कधी लबाडी किंवा कपट-करस्थान कधीच केलं नाही. अमोल किर्तीकर विरोधात मी प्रचार करणार हे जाहीर केले होते, त्याप्रमाणे मी त्यांच्याविरोधात प्रचार करणार आहेच. पण अमोल किर्तीकर यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात. भाजपाने यंदा ‘४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यांनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा.”

“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

प्रकाश आंबडेकरांवरही टीका

पंतप्रधान मोदी या पदासाठी लायक नसून त्यांचाही विनाश होईल, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, जेव्हा मोदींना शिवीगाळ केली जाते. त्यांच्या आई-वडिलांवरून बोलले जाते. तेव्हा समजून जावे की, मोदी मोठ्या बहुमताने निवडून येणार आहेत. पायाखालची वाळू सरकल्यामुळे विरोधकांकडून असे वक्तव्ये होत आहेत.