Bakri Eid 2025 At Vishalgad Dargah: मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड किल्ल्यावरील दर्ग्यात ईद-उल-अधा म्हणजेच बकरी ईद आणि उरूससाठी प्राण्यांच्या कुर्बानीला परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना न्यायालयाने काही अटी घातल्या असून, या अटींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने ७ जून रोजी बकरी ईद आणि त्यानंतर ८ ते १२ जून दरम्यान विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात चार दिवसांच्या उरूससाठी प्राण्यांच्या कुर्बानीला परवानगी दिली आणि स्पष्ट केले की, हा आदेश याचिकाकर्त्यांना तसेच त्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्यासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना लागू असेल.
दरम्यान हा आदेश न्यायमूर्ती नीला के गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांच्या सुट्टीतील खंडपीठाने दिला. खंडपीठासमोर आज हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टने दिलेल्या तारखांना प्राण्यांची कुर्बानी देण्याची परवानगी मागितलेल्या अंतरिम अर्जावर सुनावणी पार पडली.
शाहूवाडी तालुक्यातील विशालगड येथे प्राणी आणि पक्ष्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्यासाठी पुरातत्व आणि संग्रहालय संचालक, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या विविध पत्रांना आव्हान देणारी अंतरिम याचिका ट्रस्टने त्यांच्या रिट याचिकेत दाखल केली होती.
अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की, संरक्षित स्मारकात प्राण्यांची कत्तल होत होती, महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, १९६२ नुसार, किल्ल्याच्या परिसरात अन्न शिजवण्यास आणि सेवन करण्यास मनाई आहे.
पण, याचिकाकर्त्या ट्रस्टने वकिल सतीश बी. तळेकर आणि माधवी अय्यपन यांच्यामार्फत असा युक्तिवाद केला होता की, किल्ल्याच्या परिसरात असलेला दर्गा हा ११ व्या शतकात बांधलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे. या दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे भाविक येतात.
ट्रस्टने असा दावा केला होता की, दर्ग्यावरील प्राण्यांची कुर्बानी ही एक “प्रथा” असली तरी, प्रत्यक्ष कुर्बानी सार्वजनिक ठिकाणी होत नसून, किल्ल्यापासून सुमारे १.४ किमी अंतरावरील खाजगी जागेवर बंद दराआड दिली जाते. वकिलांनी असा युक्तिवाद केला की, कुर्बानी दिलेल्या प्राण्याचे मांस दर्ग्यावरील यात्रेकरू, भाविक आणि इतरांना प्रसाद म्हणून दिले जातो. याचबरोबर हा प्रसाद किल्ल्याच्या आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या अनेक गरीब लोकांसाठी अन्नाचे स्रोत आहे.