“येत्या १५ दिवसांत सरकार कोसळणार आहे. सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे”, असं मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल (२३ एप्रिल) केलं होतं. तसंच, “मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत”, असंही वक्तव्यं आज राऊतांनी केलं आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. येत्या काळात सर्वोच्च न्यायालायात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागल्यास सरकार बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत राजकीय गणित मांडलं आहे. आज ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी छगन भुजबळांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “संजय राऊत दिल्लीत काम करतात. ते संपादक आहेत. त्यांच्याकडे माहिती येत असते. परंतु, मुख्यमंत्री बदलाबाबत माझ्याकडे अशी माहिती नाही. मुख्यमंत्री बदलले जाणार अशी परिस्थिती नाही”, असं भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं.
ते पुढे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांची केस सुरू आहे, त्यांच्याविरोधात निकाल गेला तर त्यांची आमदारकी जाईल. त्यात शिंदेसाहेब आहेत. ते गेले तर दुसरे मुख्यमंत्री येतील. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे का? आणखी काही निकाल येईल. त्यांच्या विरोधात निकाल आलाच, त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं तरी त्यांच्या सरकरला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे १४९ आमदार शिल्लक राहतात. त्यामुळे त्यांचं सरकार त्यांचंच राहिल. केवळ मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बदलू शकते”, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >> “मविआ म्हणून लढण्याची इच्छा आहे, पण फक्त…”, शरद पवारांचं सूचक विधान; आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?
आघाडीत बिघाड नाही
“महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमीच पुरेशी नसते”, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. आघाडीत बिघाड असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. यावरू छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज आघाडी आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाड होणार असल्याचा अर्थ घेऊ नका”, असं भुजबळ म्हणाले.