समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील (२०२०-२१) पहिली ते आठवीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास सुरुवात झाली आहे. तसेच जे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांच्यासाठी खुल्या बाजारात पुस्तकं विकत घेण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. आजपासून दहावीच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पुस्तकं खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत ५ कोटी ७३ लाख ३० हजार २६९ पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत ३ कोटी ८७ लाख ५ हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. १८ मे २०२० पासून मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांमधून त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांना संमग्र शिक्षा योजनेंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
पीडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद
संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाउन असल्यामुळे इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची PDF File मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत १२ वीच्या २०,५४,१९४ आणि पहिली ते एकरावीच्या ६१,२०,७५३ PDF File डाऊनलोड केलेल्या आहेत. असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने आजपासून दहावीच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांना करता येणार ऑनलाइन नोंदणी
राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरीता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने २४ तासांत केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे. तसेच बॅंक ट्रान्सफर, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड तसेच RTGS / NEFTच्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट-वे मार्फत करता येणार आहे. मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना SMS पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत.