Prithviraj Chavan : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यभरात नेत्यांचे दौरे सुरु असून या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तसेच विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौराही केला होता.

तसेच महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात बोलतानाही उद्धव ठाकरेंनी मोठं भाष्य केलं होतं. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा मी पाठींबा देतो’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडी समोरील सर्वात मोठं आव्हान काय? यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, “आमच्या पुढील सर्वात मोठं आव्हान हे महायुतीचा दणदणीत पराभव करणं आणि ज्या लोकांनी पक्ष सोडून गद्दारी केली त्यांना घरी बसवायचं.”

हेही वाचा : Sanjay Shirsat : “तुमचं सरकार आलं तर…”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय हा इथं होत नाही. याआधी मी जी भूमिका माडंली होती ती भूमिका अशी होती की, महाराष्ट्रात १९९९ पासून जेव्हा-जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि जेव्हा-जेव्हा आम्ही एकत्र निवडणुका लढलो तेव्हा-तेव्हा आम्ही आधी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय घेतला नाही. ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. मी फक्त याबाबतची पार्श्वभूमी सांगितली होती. आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय हा मुंबईत ठरणार नाही, तर याबाबतचा निर्णय हा आमचे नेते घेतील. तसेच महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी बसून काही भूमिका घ्यायची असेल तर घेता येईल. उद्धव ठाकरे देखील दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे तो प्रश्न निकाली लागला”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडी समोरील आव्हान काय?

“मला वाटतं आता आमच्या समोरील सर्वात मोठं आव्हान काय आहे तर महायुतीचा दणदणीत पराभव करायचा आणि ज्या लोकांनी पक्ष सोडून गद्दारी केली त्यांना घरी बसवायचं. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्ष ताकदीने विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. जागावाटपाची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय देखील जाहीर होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.