|| नीलेश पवार
अश्वाबाजार मात्र दरवर्षीप्रमाणे
नंदुरबार : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नसली तरी करोनाच्या नियमावलीचे पालन करून घोडेबाजाराला प्रशासनाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी घोडे खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. देश-विदेशातील घोडेप्रेमींना खुणावणारा सारंगखेड्याचा बाजार करोनामुळे गेल्या वर्षी रद्द झाला होता. यंदा या बाजारात किती उलाढाल होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध सारंगखेडा यात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. सारंगखेडा यात्रेत दत्तजयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनास करोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या वर्षी सारंगखेडा यात्रा होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. दत्त जयंतीच्या पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादित राहील, प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुखपट्टी, शारीरिक अंतर नियमाचे पालन, तपमापन आणि हातांची स्वच्छता करणे बंधनकारक राहणार आहे. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांकडून दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ ५० व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. दर्शनासाठी इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांना योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खुणा करण्यास सांगण्यात आले आहे.
यात्रोत्सव होणार नसला तरी १८ ते २७ डिसेंबर या कालावधीत सारंगखेड्याचा घोडेबाजार भरणार आहे. या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. घोडे बाजारात विविध भागातून विक्रेता, व्यापारी, खरेदीदार येतात. त्यांना लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. घोडेबाजाराला सशर्त परवानगी मिळाली असली तरी त्यांच्या पूरक साहित्याच्या दुकांनाबाबत अद्यापही साशंकता आहे. नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला खास पथके तैनात करावी लागणार आहेत. गेल्या वर्षी घोडेबाजार भरला नसल्याने यंदा त्यास अधिक प्रतिसाद मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल
दरवर्षी मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट अशा विविध प्रांतातून सारंगखेडा बाजारात शेकडो घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल होत असतात. दरवर्षी त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तीन वर्षांपासून चेतक महोत्सवाच्या माध्यमातून या घोडे बाजाराला भांडवली चेहरा देण्याचा प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.
पर्यटनास चालना
पुष्करच्या मेळाव्यानंतर आशिया खंडात घोडे व्यापारासाठी सारंगखेडा बाजार क्रमांक दोनवर मानला जातो. गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर, सारंगखेडा यात्रा आणि घोडे बाजारदेखील रद्द करण्यात आले होते. या ठिकाणी दरवर्षी देशविदेशातले पर्यटक आणि घोडेशौकीन आवर्जून भेट देतात. गेल्या वर्षी घोडबाजार झाला नव्हता. त्यामुळे यंदा पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.