Dada Bhuse on 3rd Language Compulsory from 1st Standard : राज्यात पहिलीपासूनच तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, तिसरी भाषा म्हणून हिंदीलाच शाळा व सरकारकडून प्राधान्य दिलं जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, “विद्यार्थी त्यांना हवी ती तिसरी भाषा शिकू शकतात”, असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. भुसे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की “पहिलीपासून पाचवीपर्यंतचे विद्यार्थी त्यांच्या इच्छेप्रमाणे हवी ती तिसरी भाषा शिकू शकतील”, यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे.
दादा भुसे म्हणाले, “आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे तिसरी भाषा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. देवनागरी लिपीमुळे व संवाद साधत असताना मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेचा वापर केला जातो. मात्र, विद्यार्थी मागणी करतील त्याप्रमाणे त्यांना तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन केलं जाणार आहे. ते करत असताना कोणत्याही वर्गातील एकूण पटसंख्येपैकी २० विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची मागणी केली तर त्यांना त्यांच्या पसंतीची भाषा शिकवली जाईल. ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या-त्या शाळेत उपलब्ध करून दिला जाईल. काही ठिकाणी पटसंख्या कमी असेल, अथवा कमी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पसंतीची भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल अथवा इतर सुविधा निर्माण करून दिल्या जातील”.
सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य : दादा भुसे
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारल्यावर दादा भुसे म्हणाले, “असं आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्या शाळांवर कठोर कारवाई करू. एक-दोनदा समज देऊन पाहू. समज दिल्यानंतरही त्यांनी मराठी भाषा शिकवणं सुरू केली नाही तर त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल”.
अलीकडच्या काही वर्षांत मुंबईतील १३२ मराठी माध्यांच्या शाळा बंद बडल्या आहेत. याबाबत दादा भुसे म्हणाले, ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. मात्र, राज्यातील मराठी शाळा कशा टिकतील, कशा वाढतील याकडे आमचं सरकार लक्ष देत आहे. महापालिका शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.