कराड : कराडचे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय उपेक्षांचे बळी ठरले असल्याने आता हे रुग्णालय दत्तक घेऊन ते सर्वांगाने विकसित करावे, अशी मागणी ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अनेक वर्षांपासून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा नाहीत तसेच वाढीव खाटा मिळण्यासाठी ‘प्रहार जनशक्ती’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गोरगरीब रुग्णांवर खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ येत असल्याची कैफियत ‘प्रहार जनशक्ती’च्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री आबिटकर यांच्यासमोर मांडली.
‘प्रहार जनशक्ती’चे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटून सविस्तर निवेदन सादर केले. कराड उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या गरजांकडे लक्ष वेधले. यामध्ये वाढीव दोनशे खाटा, ट्रॉमा केअर युनिट, एमआरआय सुविधा मंजूर असूनही स्थलांतरित करण्यात आलेली कॅथलॅब पुन्हा कराडला कार्यान्वित करणे, तसेच रिक्त तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी केली आहे.
कराड, पाटण, खटाव, कडेगाव, शिराळा यांसारख्या तालुक्यांतील लोक वैद्यकीय उपचारांसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, सद्यस्थितीत येथे केवळ शंभर खाटांचीच व्यवस्था असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था पुरेशी नाही. याशिवाय, अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले ‘ट्रॉमा केअर युनिट’ आणि ‘एमआरआय’ सुविधा येथे उपलब्ध नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वेळ वाया घालवून खासगी रुग्णालयात हलवावे लागते.
राज्य शासनाने सन २०२२ मध्ये कराड रुग्णालयासाठी कॅथलॅब मंजूर केली होती. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून ती सुविधा सातारला स्थलांतरित करण्यात आली. हे अतिशय अन्यायकारक असून, यामागील कारणे अस्पष्ट असल्याची टीका या निवेदनात करण्यात आली आहे. कराडसाठी मंजूर झालेली ही सुविधा कराडलाच परत कार्यान्वित करावी, अशी मागणी माळी यांनी केली आहे.
प्रहार जनशक्तीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दत्तक घेऊन स्मार्ट रुग्णालय करा
माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभारले जावे आणि महाराष्ट्रासाठी एक ‘स्मार्ट रुग्णालय’ म्हणून आदर्श ठरावे, यासाठी आरोग्यमंत्र्यांनी स्वतः हे रुग्णालय दत्तक घ्यावे, अशी भावनिक मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दीर्घकाळपासून संघर्ष
प्रहार जनशक्ती पक्ष २०१५ पासून उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवा-सुविधांसाठी आंदोलने व बेमुदत उपोषण करत निवेदनेही देत आली आहे. मात्र, अद्यापही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता या विषयावर निर्णायक पावले उचलण्याची गरज असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.