सोलापूर : कर्नाटक राज्यात येथील काँग्रेस सरकारने धरणातील पाणी कालवा आणि मुख्य वितरीकेवाटे थेट शेतशिवारात पोहोच करण्याचा पथदर्शी प्रकल्प संगणकीकृत प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण महाराष्ट्रात महायुती सरकारनेही करावे, अशी सूचना माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात सादरीकरणासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेच्या जलसंधारण स्थायी समितीने अलीकडेच केरळ आणि कर्नाटकात दौरा करून तेथील जलसंधारण विभागाशी संबंधित कामांचा आढावा घेतला होता. या समितीमध्ये खासदार मोहिते-पाटील यांचाही सामावेश होता. या दौऱ्यात कर्नाटकात धरणाच्या पाण्याचे संगणकीकृत प्रणालीद्वारे राबविलेल्या पथदर्शी प्रकल्पाची पाहणी करता आली. त्याची माहिती देताना खासदार मोहिते-पाटील म्हणाले, या पथदर्शी प्रकल्पातून धरणापासून मुख्य कालवा, मुख्य वितरिका ते थेट शेतकऱ्यांच्या शेतात पूर्णतः संगणकीकृत प्रणालीद्वारे पाणी सोडले जाते. यात कोठेही मानवी हस्तक्षेप न ठेवता शेतकऱ्याने मोबाईलवर केलेल्या मागणीनुसार त्याला पाणी मिळते.
अगदी शेवटच्या टोकावरील शेतकरीही पाण्यापासून वंचित राहात नाही. हा पथदर्शी प्रकल्प जलसंपदा विभागाबरोबर कृषी विभागालाही जोडण्यात आला आहे. त्यामुळे संगणकीकृत पर्जन्यमापकाच्या यंत्रणेसह हवामान, माती परीक्षण, कोणती पिके लागवडीसाठी अनुकूल, यांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होते.
या पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रातही राबविण्यात आल्यास ग्रामीण व शेती विकासात आमूलाग्र बदल घडवून आणता येईल. त्यादृष्टीने सादरीकरणासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांना भेटणार आहोत. या पथदर्शी प्रकल्पामध्ये धरणात किती पाणी आहे ? कालव्यात आणि वितरिकेत किती पाणी सोडले आणि शेतात किती पाणी पोहोचले, यांची अचूक माहिती मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळते. त्यानुसार पाणी नियोजन करता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, सध्या उजनी धरणात सह्याद्री घाटमाथ्यावरून आणि भीमा खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरण झपाट्याने भरत आहे. पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. त्याऐवजी धरणातील पाणी प्रथम कालवे, ओढे, नाल्यांना सोडल्यास आगामी काळात शेतकऱ्यांची मोठी सोय होईल. शेवटी अतिरिक्त पाणी नदीवाटे सोडण्यात यावे, अशीही मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी केली.