राहाता: करोना कालावधीत चार वर्षे शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना हार, फुले, प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आली होती. ही बंदी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हटवली गेली नाही तोच आता पुन्हा भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान प्रशासनाने ही बंदी पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी, फुलांचे गुच्छविक्रेते, हार ओवणाऱ्या महिला व दुकानदारांवर पुन्हा आर्थिक आरिष्ट कोसळले आहे.

साईबाबा संस्थानच्या या निर्णयाचा अनेकजण समाजमाध्यमातून सध्या निषेध व्यक्त करत आहेत. करोनाचा कालावधी संपल्यानंतरही साई संस्थांनने चार वर्ष बंदी कायम ठेवली होती. ती पुन्हा सुरू करावी यासाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी संस्थान प्रशासनाला निवेदन देत आंदोलने केली होती. पोलिसांनी गुन्हेही दाखल केले होते. करोना कालावधी हटविल्यानंतर राज्यातील इतर मंदिरांतून हार, फुले अर्पण करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, शिर्डीच्या साई मंदिरात बंदी कायम होती.

शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे कैफियत मांडली. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सन २०२३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून निर्णयाला आव्हान दिले. उच्च न्यायालयाने, विषय श्रद्धेचा असून संस्थानाने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्णय घ्यावा. मंदिरात हार, फुले नेण्यास, अर्पण करण्यास कोणती हरकत नाही, असा आदेश दिला होता.

या आदेशानुसार नोव्हेंबर २०२४ मध्ये मंदिरातील हार व फुलांची बंदी उठल्याने शिर्डीतील साई मंदिरासमोर अनेक शेतकऱ्यांनी व हार, फुले विक्री करणाऱ्या दुकानदारांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. बंदी उठल्याने अनेक बेरोजगार, महिला, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला.सध्या सुटीचा कालावधी असल्याने शिर्डीत भाविकांची गर्दी होणार व हार, फुले, प्रसाद विक्रेत्यांची आर्थिक उलाढाल चांगली होण्यास मदत होईल, या अपेक्षेने आनंदाचे वातावरण होते.

मात्र भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात हार, फुले व प्रसाद नेण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने पाच महिन्यांतच पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला गेला. या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे. साईबाबा संस्थान प्रशासनाकडून साईभक्त व स्थानिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. संस्थान काही नियम शिथिल करत व्हीआयपी भक्तांना वेगळा न्याय देते व सर्वसामान्य भाविकांना वेगळा न्याय लावला जात असल्याचेही स्पष्ट होत आहे.

उत्पादकांचे नुकसान

साईबाबा संस्थानाने अचानक हार-फूल बंदीचा निर्णय घेतल्याने उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. राहाता तालुक्यातील, शिर्डी परिसरातील फूल उत्पादकांचे रोजचे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे फुलांचे दर कोसळले आहेत. ५० रुपये किलोचा झेंडू १५ ते २० रुपये, तर गुलाबाची विक्री ७०० रुपयांवरून २५० रुपयांवर आली आहे. शेतकरीहिताचा निर्णय घेऊन बंदी उठवावी. – राजेंद्र जपे, अध्यक्ष, राहाता तालुका फूलउत्पादक शेतकरी संघटना

यंत्राद्वारे स्कॅनिंग करा

साईबाबा संस्थान व पोलीस प्रशासनाने कोणतीही अधिसूचना न काढता अचानक हार, फुले, प्रसादावर बंदीचा निर्णय घेतला. यामध्ये स्थानिक व्यावसायिक व शेतकऱ्यांचा विचार करण्यात आला नाही. यापूर्वीही साईबाबा संस्थानला धमकीचे पत्र आले होते. त्या वेळी कधी बंदी घातली नाही. संस्थान व पोलिसांनी सुरक्षेवर भर द्यावा. आवश्यकता वाटल्यास हार, फुले, प्रसादाचे यंत्राद्वारे तपासणी करावी. परंतु त्यावर बंदी घालून सुरक्षा वाढवण्याचा कांगावा करू नये. स्थानिक व्यावसायिक आधीच डबघाईला आले आहेत. प्रशासनाचा निर्णय अन्यायकारक वाटतो; तो मागे घ्यावा. – मयूर दुशिंग, हारविक्रेता, शिर्डी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास नाही का?

श्री साईबाबा संस्थान भक्तांनीच दिलेल्या दानाच्या पैशातून कडक सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करते. असे असताना हार, फुले, प्रसाद बंद करत असेल, तर संस्थानाचा सुरक्षा व्यवस्थेवर, साईबाबांवर विश्वास नाही का? – विजय काकडे, युवक तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, राहाता