अलिबाग : रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराची प्रकार धांबण्याची चिन्ह दिसत नाही. काही दिवसांपूर्वी अलिबाग तालुक्यातील खैरवाडी येथे एका कुटूंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला होता. आता मुरुड तालुक्यातील चोरढे गावातील स्मारकाच्या जागेचा वादाचे प्रकरण न्यायालयात नेले म्हणून एका कुटूंबाला वाळीत टाकल्याची प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरढे गावातील एका समाजातील ग्रामस्थांनी गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या जागेत नवीन मंदिराचे बांधकाम केले. त्या मंदिरालगत असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदलून ते स्मारक मुख्य रस्त्यात वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी बांधले. ही जागा बदलावी, यासाठी त्यांनी समाजाच्या पंचांबरोबरच शासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार कुटूंबाने या बांधकामाविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
या गोष्टीचा राग धरून चोरढे गावातील समाजाचे पंच मंडळ आणि इतर २३ जणांनी गावातील हनुमान मंदिरात गावकाची सभा घेतली, आणि न्यायालयात दाद मागणाऱ्या कुटूंबाला वाळीत टाकले. या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास इतर ग्रामस्थांना मज्जाव केला. संबध ठेवल्यास तीन हजार रुपयांचा दंड करण्याचा ठरावही घेतला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पंच कमिटी आणि इतर ग्रामस्थ अशा एकूण २३ जणांविरोधात सामाजिक अपात्रता प्रतिबंधक अधिनियम २०१६ तील विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हाशीलकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वाळीत प्रकरणाच्या घटना घडू नये, यासाठी वारंवार ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या आहेत. गावबैठकांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात येत आहेत. चोरढे येथील वाळीत प्रकरणाची घटना उघड झाल्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत तपास अधिक सुरु आहे. श्रीकांत किरवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
