कर्जत : श्रीगोंदा तालुक्यात उख्खलगाव परिसरात अतिवृष्टीने ओढ्याला आलेल्या पुरात भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर (वय ४२) हा शेतकरी वाहून गेला. नंतर त्याचा मृतदेह आढळला. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी कोरेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच पाझर तलावाचा भरावही खचला.श्रीगोंदा-पारनेर-नगर तालुक्याच्या सीमारेषेवरील उख्खलगाव येथे रविवारी दुपारी अवघ्या दोन तासांतच १०० मिमी पाऊस झाला. पीक व रस्ते पाण्याखाली गेले. पाझर तलाव क्रमांक एकच्या मातीचा भराव साडेगावाजवळ खचला. त्यामुळे वाळके मळ्याशी गावाचा संपर्क तुटला होता.
यावेळी शेतकरी भाऊसाहेब कोरेकर हे ओढ्याच्या पलीकडे असलेल्या शेळ्यांचा जीव वाचवण्यासाठी गेले. सर्व शेळ्या घेऊन ते परत येत असतानाच पुराच्या पाण्यात वाहून गेले. या पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले. आमदार पाचपुते यांनी आज सोमवारी उख्खलगावला भेट देत दिली व शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या तसेच कोरेकर कुटुंबीयांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले.
कृषी विभागाने पिकांचे व बांधकाम विभागाने पुलाचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना आमदार पाचपुते यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगल, गटविकास अधिकारी राणी फराटे, कृषी अधिकारी कांती चौधरी, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय हाके, सुभाष वाळके प्रा. संजय लाकूडझोडे, बापू ढवळे आदी उपस्थित होते.