सांगली: संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास रेल्वे विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने वसगडे (ता. पलूस) येथे मंगळवारी शेतकऱ्यांनी लोहमार्गावर ठाण मांडले. यामुळे डिझेलवाहक रेल्वे लोहमार्गावर थांबून राहिल्याने मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणात वसगडे येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तसेच रेल्वेमार्गालगत असणाऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी सेवा रस्ताच त्यांना रेल्वेने दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाशी लढा सुरू आहे. यापूर्वी चार बैठका झाल्या असून, यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज वसगडे येथील शेतकऱ्यांनी डिझेल वॅगन रोखून धरत रेल्वेमार्गावरच ठाण मांडले. निर्णय होत नाही, तोपर्यंत रोखून धरलेली रेल्वे सोडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमुळे आंदोलकांनी लोहमार्गावरून हटण्यास नकार दिला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नसल्याचे आंदोलक रजत पाटील यांनी सांगितले.