अलिबाग- रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला त्यामुळे कुंडलिका आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. त्यामुळे निर्माण रोहा, नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात रात्रभर पावासाचा कहर सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली. कुंडलिका, आंबा नद्यांनी सकाळी धोका पातळी ओलांडली. पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहायला लागली. सावित्री आणि उल्हास नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. सकाळी आठ वाजता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने या संदर्भातील अधिसूचना जारी प्रसिध्द करण्यात आली. सकाळीच्या सत्रातील शाळा तातडीने सोडण्याचे निर्देश देण्यात आले. अलिबाग, रोहा,तळा, महाड पोलादपूर या तालुक्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आंबा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने पाली खोपोली मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील भेराव गावचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे या गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने, नदी किनाऱ्यांवरील गावे आणि डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग १९० मिमी, मरुड ६७ मिमी, पेण १९५ मिमी. पनवेल २०३ मिमी, उरण १६६ मिमी, कर्जत १३२ मिमी, खालापूर २०५ मिमी, माथेरान २६२ मिमी, सुधागड १५६ मिमी, माणगाव १०६ मिमी, तळा १०६ मिमी, महाड १२६ मिमी, पोलादपूर १०५ मिमी, श्रीवर्धन ११७ मिमी, म्हसळा १३० मिमी, तर रोहा येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली.