कराड : काँग्रेसचा स्वातंत्र्य लढ्यापासूनचा प्रवास आजही जनमनात जिवंत असून, काँग्रेस कधीही संपणार नसल्याचा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपला पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांची गरज लागते, असा टोला त्यांनी लगावला.
कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस इतर मागास (ओबीसी) विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे स्थानिक नेते नामदेव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त मेळाव्यात सत्कारही करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, काँग्रेसचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचलेला असून, काँग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी सत्ताकाळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, सत्तेसाठी भाजपने खोट्या आरोपांवर आधारित खोटे कथानक बनवून जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली आहे.
भाजपने काँग्रेसवर सन २०१४ मध्ये भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून सत्तेत येण्याचा मार्ग शोधला. मात्र, न्यायालयात हे आरोप सिद्ध झाले नाहीत आणि काँग्रेसचे नेते निर्दोष ठरले. तरीही काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. याउलट भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे कार्यकर्ते किंवा संघटनात्मक ताकद नसल्याने काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपलाही पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांची गरज लागली आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारी भाजप आज काँग्रेसयुक्त झाली आहे, हे त्यांनाही कळले नाही, अशी टीका चव्हाणांनी केली.
राजकीय हेतूने सत्तेचा गैरवापर
सत्तेचा गैरवापर करत भाजपने अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आदी यंत्रणांचा वापर करून काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकला. विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना त्यांना दोषमुक्ती (क्लीन चीट) दिली जात आहे. हा प्रकार लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा असून, भाजपने केवळ सत्तेसाठी देशातील धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
विकास आकड्यांचा खेळच
भाजपचा विकास आकड्यांचा खेळच असून, विकासाचे जे आकडे मांडलेत, ते खोटे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांनी कोणतीही ठोस विकासनीती राबवलेली नाही, तर धार्मिक ध्रुवीकरण करून सत्ता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने देश कधीही प्रगती करू शकत नाही, हे जागतिक इतिहासाने सिद्ध केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.