सातारा: साताऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वळवाच्या पावसाने शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अजिंक्यतारा किल्ल्याच्या उताराने मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने व सांडपाणी वाहून येणारी व्यवस्था तोकडी पडल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. वेगात आलेले पाणी अनेक घरांमध्ये शिरत भिंत पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ता, नाल्यांचे कठडे वाहून गेले आहेत. शहरातील सखल भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात माण, खटावसह कोरेगाव, रहिमतपूर, सातारा, वाई, कराड तालुक्यात या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांपासून सातारा शहरासह जिल्ह्यात रोज मुसळधार पाऊस कोसळत आहे. उतारावरील या शहरात पावसाच्या पाण्याचे लोट अनेक घरे-वस्त्यांमध्ये शिरले. सखल भागात पाणी तुंबले. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी गेल्या चार दिवसांतील पावसामुळे उघडी पडली आहे. याचा फटका अनेक नागरिकांना बसल्याने संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे मार्ग साफ न केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यात अडथळे तयार झाल्याच्या तक्रारी नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरही मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांच्या पावासाने महामार्गावर पाणी साचले, तर संपूर्ण रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत असल्याचे दिसून आले. पाण्याखाली रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनचालक अडचणीत सापडले असून, अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत या पावसाने चांगलाच जोर आजही धरला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. पावसामुळे कांदा, आंबा, डाळिंब; तसेच कोबी, फ्लाॅवर, टोमॅटो आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पिके पाण्यात बुडाली आहेत. अनेक शेतातील माती वाहून गेल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. थोडाफार पाऊस उघडताच शेतकरी शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांसह माण खटावसारख्या दुष्काळी भागातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे येथील पर्यटनासही फटका बसला आहे. महाबळेश्वर पाचगणी येथे आलेल्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.