नांदेड : मृग नक्षत्रानंतर १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पावसाने दणदणीत हजेरी लावली. जिल्ह्यातील ९५ पैकी तब्बल ३९ मंडळात अतिवृष्टी झाली. माहूर मंडळात १५६ मि.मी. एवढा पाऊस झाला. अन्य नऊ मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नांदेड शहर व परिसरात रात्रभर कोसळधार सुरूच होत्या.

मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस काही दिवस नियमित बरसला. परंतु, १ जूननंतर मृगाच्या दुसऱ्या दिवशी दि. ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर जी पावसाने विश्रांती घेतली तो बुधवारी परतला. दुपारनंतर आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी सहापर्यंत कमी अधिक प्रमाणात बरसत होता. अर्थात दरवर्षी प्रमाणे मृग कोरडा गेल्यानंतर आर्द्राने बळीराजासह चराचराला आधार दिला. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पडलेला पाऊस एकूण सहा तालुक्यांत व ३९ मंडळात अतिवृष्टी म्हणून नोंदला गेला.

या पावसाळ्यात कालपर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी तुलनेत १२७.३९ टक्के पाऊस झाला आहे. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पडलेल्या या पावसामुळे २५ पेक्षा कमी क्षेत्रावर जी पेरणी झाली आहे, त्या पेरणीला जीवदान मिळाले असून, उर्वरित पेरण्यांना पुढील दिवसात वेग येणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत विष्णुपुरी प्रकल्पात पावसाची आवक सुरू झाली नव्हती; परंतु मराठवाड्यात जायकवाडीसह येलदरी व अन्य काही प्रकल्पात आवक सुरू झाली आहे.

रेणुकामाता मंदिराच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला

साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ असणाऱ्या रेणुकामाता मंदिराची एक संरक्षण भिंत कोसळल्याने भाविकांनी दान केलेल्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. संरक्षक भिंत बांधण्याचे प्रलंबित काम गेल्या चार- पाच दिवसांपासून सुरू झाले होते. रात्री झालेल्या पावसामुळे भिंतीचा काही भाग कोसळला. ज्या भागात भिंतीचा भाग कोसळला तिथे भाविकांनी अर्पण केलेले साहित्य ठेवण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुर्घटनेमुळे या साहित्याचे नुकसान झाले. अलीकडेच राज्य सरकारने मंदिर विकासासाठी ७२९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशामुळे ‘स्काय वॉक’ प्रकल्पही हाती घेण्यात आला होता. पावसामुळे संरक्षक कठड्याचा भाग पडल्याने कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. संबंधित कंत्राटदाराने संरक्षण भिंतीच्या खालपर्यंत जेसीबीद्वारे खोदकाम केले होते. त्यात पावसाची भर पडल्याने काही भाग कोसळला. सुदैवाने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे नुकसान झाले नाही.