हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव, डोंगरकडा, वडगाव माळेगावसह इतर गावच्या शिवारातून जाणाऱ्या नांदेड-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची नोटीस अथवा पूर्वसूचना न देता सीमांकन करून रोवलेल्या खुणा शेतकऱ्यांनी उखडून फेकल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दाद न दिल्यामुळे भुते यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये भाटेगाव, डोंगरकडा, जवळा पांचाळसह इतर गावच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, हा भाग ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येतो. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण क्षेत्र हे बागायती आहे. या उपलब्ध शेतीवरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जबरदस्तीच्या जोरावर ही शेतजमीन भूसंपादन केली. तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच या लाभक्षेत्रातील कित्येक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शासनाच्या ध्येय धोरणात पुनर्वसन करण्याची कोणतीच मुभा नाही. शेतकऱ्यांना शक्तिपीठ अथवा भूसंपादन अधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता या जमिनी सीमांकन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी भाटेगाव क्षेत्रातील जमिनीचा मोबदला ‘ब’ आणि ‘क’ या वर्गवारीनुसार हेक्टरी एक कोटी दहा लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा शेतकऱ्यांनी भाटेगाव हे गाव विनाकारण डोंगरी म्हणून शासकीय दप्तरी नोंद असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आमच्या जमिनीचे कवडीमोल दराने पैसे मिळाले आणि आताही तोच प्रकार होणार असल्याचे मत मांडले. तसेच मिळणारा मावेजा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही तर शेतजमीन आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास आमचा सक्त विरोध असल्याचे भूसंपादन अधिकारी भुते यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.