सातारा : बकर ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद (ता. खंडाळा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज भरलेल्या शेळी मेंढी बाजारात ६० हजार बोकडांची विक्रमी आवक झाली होती. २० हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत बोकडांची खरेदी- विक्री झाल्याने बाजारात ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त होत आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र बकर ईद सण उद्या (शनिवारी) असल्याने पश्चिम महाराष्ट्रात कांदा व शेळी मेंढी बाजारासाठी राज्यात अग्रगण्य असलेल्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज भरलेल्या बकरी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. पहाटेपासूनच सातारा सोलापूर जिल्ह्यातील मेंढपाळ, शेतकरी आपल्या शेळ्या, मेंढ्या व बोकड विविध वाहनांतून बाजार आवारात घेऊन येत होते. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, मैसूर, बंगळूर, हैदराबाद, विजापूर व गोवा आदी परराज्यातील, तर कोकणातील, महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पंढरपूर आदी भागांतूनही मेंढपाळ व खरेदीदार येथे आले होते. त्यामुळे येथील शेळी-मेंढी बाजार शेतकरी, मेंढपाळ व खरेदीदार यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बकर ईद सणामुळे बोकडांची मोठी आवक झाली आहे. – प्रा. सुनील शेळके-पाटील, सभापती, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीच्या वतीने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा प्राधान्याने मिळाल्या आहेत. त्यामुळे लोणंद बाजार भरभराटीला आला आहे. – अरुण गालिंदे, संचालक, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती