अलिबाग: सुनील तटकरे आज जरी अजित पवार यांच्या सोबत असले, तरी जेव्हा भाजपमध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी केली. दिल्लीची ताकद किती जरी मोठी असली तरी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते मुरूड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधीत करतांना आमदार रोहीत पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टिका केली. राजकारणाच्या सुरूवातीला सुनील तटकरे आधी बॅरीस्टर अंतुले यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. शरद पवारांसोबत होते त्यांची साथ सोडली. शेकापच्या जयंत पाटील यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे सुनील तटकरे हे पहिले व्यक्ती असतील असे ते म्हणाले.

हेही वाचा : विदर्भ, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा इशारा; तापमानात होणार वाढ

केंद्रात आणि राज्यात ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा सुप्रिया सुळे खासदार होत्या, पण आपल्या मुलीला डावलून शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रीपदे दिली. काही लोकांना राज्यात तर काही लोकांना केंद्रात देखील मंत्रीपद दिले. आज हे नेते त्यांना सोडून गेलेत आणि आम्हाला पवार साहेबांनी काय दिले असा प्रश्न उपस्थित करत फिरत आहेत. आमच्याकडून सत्तेत गेले तेव्हा ९ खासदार आणि ९० आमदारकीची तिकीटांची स्वप्न पाहत होते. आज त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. येणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत उमेदवारांना लाखांच्या मताधिक्याने पाडा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : “…तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, अशोक चव्हाण यांचे विधान चर्चेत

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सभेला संबोधीत करताना मोदी सरकारवर टीका केली. १९७७ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून जी चूक केली होती. तीच चूक आज मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार करत आहे. लोकांच्या स्वातंत्र्यावर जेव्हा गदा येते तेव्हा लोक सत्ता उलथून लावतात. त्यामुळे आणीबाणीनंतर जी परिस्थिती काँग्रेसची झाली होती. तीच परिस्थिती भाजपची होणार, ईडीच मोदी सरकार बुडवेल असे ते म्हणाले. गेल्या निवडणूकीत आम्ही तटकरेंना मदत केली पण आता ती चूक सुधारायची आहे. तटकरेंचा पराभव करून बदला घ्यायचा असल्याचेही ते म्हणाले. आजही जिल्ह्यात शेकापची पाच लाख मते आहेत. नेते गेले तरी जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे मावळ आणि रायगड लोकसभा निवडणूकीत आमची ताकद दाखवून देऊ असा विश्वास आमदार पाटील यांनी बोलून दाखवला. माजी आमदार अनिल तटकरे आणि पंडीत पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले.