रायगडमध्ये सध्या रुमालावरून राजकारण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले व रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील विस्तव जात नाही. गोगावले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या महाडमध्ये तटकरे यांनी खांद्यावर रुमाल टाकून त्यांची नक्कल केली. हाच धागा पकडून राष्ट्रवादीची सभा झाली त्याच मैदानात दोन दिवसांपूर्वी गोगावले यांनी सभा घेतली व उपस्थितांना रुमालांचे वाटप केले. गोगावले यांचे आगमन होताच रुमाल उंचावून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘गोगावले यांच्या रुमालाची तुम्हाला भीती किती’, अशा घोषणा तटकरेंना उद्देशून देण्यात आल्या. त्यामुळे महायुतीमधील या दोन नेत्यांमधील ‘रुमाला’चे राजकारण किती ताणले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

साखर संकुलातील ‘गोडवा’

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, येणार असतील तर कधी, याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले, की एकीकरणाच्या चर्चांना उधाण येते. पुण्यातील साखर संकुल हे ठिकाण या चर्चेसाठी परवलीचे झाले आहे. त्या मागील कारण असे, की उसाच्या लागवडीमध्ये कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर कसा करता येईल, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात करार झाला . या दोन्ही संस्थांशी शरद पवार आणि अजित पवार यांचा संबंध असल्याने दोघेही याबाबतच्या बैठकांना उपस्थित राहात आहेत. दोघे अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसले आहेत. ‘व्हीएसआय’ची वार्षिक सभा, रयत शिक्षण संस्था, अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा आदी मोजके प्रसंग आहेत. मात्र, साखर संकुलमधील बैठकांची विशेष चर्चा होते.

अजितदादांचे जहाज बुडणार की ?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असताना दोन्ही पक्षांचे नेते तशी शक्यता नाकारत आहेत किंवा त्याबद्दल माहीत नसल्याचे सांगत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनीही तशीच प्रतिक्रिया देताना, आपले चुलते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला सावधानतेचा इशारा दिला आहे. अजित पवार पक्षाचे जहाज जेवढ्या क्षमतेचे आहे, प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त प्रमाणात माणसे बसली आहेत. भले या पक्षात जाणाऱ्या माणसांचा हेतू कोणता का असेना किंवा बहुसंख्य माणसे शरद पवार यांच्या पक्षातून गेलेली असोत, पण अजित पवारांच्या पक्षाचे जहाज क्षमतेपेक्षा दुप्पट माणसांनी टंब भरले आहे. त्यामुळे हे जहाज पुढच्या वाटचालीत कोणत्याही क्षणी माणसांचा भार न पेलता हेलकावे खाण्याची आणि पाण्यात बुडण्याची शक्यता वाटते. रोहित पवार यांनी दिलेला हा इशारा अगदी सहज म्हणायचा की त्याचा आणखी काही वेगळा अन्वयार्थ असू शकतो, हे दोघांनाच ठाऊक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संकलन : हर्षद कशाळकर, सुजित तांबडे, एजाज हुसेन मुजावर)