सातारा : राज्यातील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण ३१ मेपर्यंत हटवण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्यालगत असलेले अनधिकृत बांधकाम (थडगे) मध्यरात्री हटवले. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली जाणार असल्याने तो परिसर साफ करण्यात आला आहे.
मागील तीन वर्षांपासून शहरासह जिल्ह्यामध्ये गड-किल्ल्यांवर अतिक्रमण केलेल्या जागांवरील अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीभोवतची अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले. किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशीही देखील गेल्या काही वर्षात एका थडग्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. हे अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर परिसर मोकळा करून घेण्यात आला आहे. आता या परिसरात पाण्याची टाकी बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी हे अधिकृत बांधकाम करण्यात आले होते. राज्यातील गडकिल्ल्यांवर असलेली अतिक्रमणे ३१ मेपर्यंत हटवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित अनधिकृत थडग्याबाबत पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, याबाबत पालिकेशी कुणी व्यक्ती किंवा संस्थेने पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पालिकेचे अधिकारी, अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी यांच्यासह जेसीबीसह अन्य यंत्रणेद्वारे हे बांधकाम पाडण्यात आले.