भंडारा : पूर्व विदर्भातील सिंचनवृद्धीच्या दृष्टीने भंडारा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात सिंचनवाढीसोबतच मत्स्य शेती, पशू संवर्धन तसेच कृषीपूरक व्यवसायांमध्ये वाढ झाली असली तरी खाण, बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात मात्र भंडारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवरच आहे.
जिल्ह्यात १२३ नोंदणीकृत कारखान्यांपैकी ६३.४१ टक्के कारखाने सुरू आहेत. त्यामुळे औद्याोगिकीकरण आणि कारखाने यात जिल्हा मागासलेला आहे. कामगारांची संख्या ९ हजार ५६० आहे. जिल्ह्यात वन आणि जलपर्यटनासाठी प्रचंड वाव असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीअभावी ही बलस्थाने अजूनही पाहिजे त्या प्रमाणात उभारी घेऊ शकली नाहीत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य, नवीन नागझिरा, पवनी- उमरेड- कऱ्हांडला येथून जंगल सफारीसाठी हजारो पर्यटक दरवर्षी येतात. यातून लाखोंची उलाढाल होते. जिल्ह्यात अस्थायी असलेले १४०३.६२ चौ.किमी. वनक्षेत्र हे जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ३४.३४ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत वन उत्पादनापासून जिल्ह्याच्या उत्पन्नात तब्बल ४३ टक्क्यांची वाढ झाली.
कर्ज वितरणात वाढ
कर्ज वितरणात होणारी वाढ आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी पोषक वातावरणनिर्मिती करते. मात्र भंडाऱ्यात याउलट परिस्थिती आहे. ५६ ठिकाणी ११४ बँक शाखा आहेत. या वर्षी ९८०० कोटी रुपयांच्या ठेवी असून २६६९ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यात ११५२ कोटी रुपयांचे कृषीकर्ज आहे. असे असले तरी जिल्ह्यात मुद्रा कर्जांतर्गत केवळ ५५ हजार ९४२ लाभार्थ्यांना ४०१.५६ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
साक्षरतेचे प्रमाण ८३.७६ टक्के
जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ८३.७६ टक्के असून राष्ट्रीय साक्षरतेच्या (७४.०४ टक्के) प्रमाणापेक्षाही अधिक आहे.
भात पिक उत्पादनात वाढ
भंडारा जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. २०२४ मध्ये भाताचे उत्पादन ४३९३.७३ मेट्रिक टन असून आधीच्या वर्षीच्या तुलनेत १३.९७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. ऊस, गहू, सोयाबीन, हरभरा, जवस या पिकांच्या उत्पादनातही वाढ झालेली आहे. याउलट तूर, मूग, उडीद, तीळ, कापूस या पिकांचे उत्पादन घटले आहे.
रस्त्यांचे जाळे
२०२४ अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४२०.२२ कि.मी. व जिल्हा परिषदेचे ४८८५.७३ कि.मी. लांबीचे रस्ते असून नगरपालिकेच्या हद्दीतील ६३७.७५ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत.
आरोग्य सुविधांत वाढ
मागील वर्षी १०० खाटांचे शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले असून वैद्याकीय सेवेत वाढ झाल्यामुळे मृत्युदरात घट झाल्याचे दिसून येते. असे असले तरी मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. बालमृत्यूंची संख्या १५३, तर अर्भक मृत्यूंची संख्या १२५ इतकी नोंदवण्यात आली आहे.