ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून  भाजपाने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही राज्यातील भाजपा नेत्यांकडून सातत्याने केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला.

“ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होते. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिले आहे त्यात इम्पिरिकल डेटा जवळपास ९८ टक्के बरोबर असल्याचं विधान केले होते आणि त्यानंतर केंद्र सरकारने  हा डेटा देताना कोर्टात त्यात बऱ्याच त्रुटी आहेत असे विरोधी विधान केले आहे. तसेच आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपाच्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केले आहे. ओबीसींचा पुन्हा सर्वे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आली आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार  कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे. म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचा आरक्षण गेल आहे. उद्या कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे त्यामुळे भाजपाने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

मंत्री जयंत पाटील शुक्रवारी डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. .

परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न – जयंत पाटील

राज्यात शासकीय परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते मात्र काही एजन्सी ब्लॅक लिस्ट आहेत. काही एजन्सी याचा गैरफायदा घेणाऱ्या आहेत. फार कमी एजन्सी आहेत  सक्षम करण्यास परीक्षा देऊ शकतात. दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली. याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा  निर्णय घेतला. मेरिटच्या मुलांवर अन्याय  होऊ नये ,परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे.”

केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार – जयंत पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना भाजपामध्ये प्रवेश केला होता आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी, “काही नगरसेवक हे राष्ट्रवादी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल.” तर नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला व महाविकास आघाडी झाली तर भाजपाचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.