मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येनंतर या प्रकरणातला एक आरोपी सोडून इतरांना अटक करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आहे अशीही चर्चा आहे. त्याच्यावरही इतर आरोपींप्रमाणे मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. त्यामुळे घडल्या प्रकरणाची जबाबदारी घेऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. मात्र अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे हे आधुनिक तुकाराम महाराज आहेत असं म्हणत खोचक शब्दांत टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री महाराजांच्या वक्तव्यानंतर दिली प्रतिक्रिया

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रमाणपत्र दिले आहे. तसेच या प्रकरणात ज्यांनी संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी अशी मागणी देखील नामदेव शास्त्री महाराज यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नामदेव शास्त्रींनी काय म्हटलं होतं?

जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले. महंत नामदेव शास्त्री म्हणाले, मी त्याला त्याला म्हणालो तू वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलं आहे. गेल्या ५३ दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली. त्यांच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे. असं राजकारण चांगलं नाही, त्याचा फार काळ फायदा होईल असं वाटत नसल्याचं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. याच वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड यांचा टोला काय?

महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहिजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत त्या गादीला मोठी परंपरा आहे. भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटारसायकलवर येऊन बसलं हे सगळ्यांना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.