कर्जतः तालुक्यातील शिंपोरा-खेड रस्त्यावरील नांदणी नदीवर असलेला पूल केवळ अपुऱ्या मोऱ्यांच्या संख्येमुळे वाहून गेला. त्यामुळे परिसरातील चार गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांनी अपुऱ्या मोऱ्यांमुळे पूल वाहून गेल्याची तक्रार केली.
या वेळी रामचंद्र खराडे, महिंद्र काळे, पद्माकर काळे, तानाजी काळे, रोहन काळे, तसेच पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदार पवार यांना माहिती देताना सांगितले, की सलग चार ते पाच दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदणी नदीवर १३ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला अवघ्या दोन मोऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या रविवारी जोरदार पाऊस पडला. नदीला मोठा पूर आला. पाण्याचा प्रचंड दाब निर्माण झाला. दोनच मोऱ्यांमुळे पाणी वाहून जात नव्हते. प्रथम पुलाचा मातीचा भराव वाहून गेला. नंतर पूर्ण पूल वाहून गेला.
परिसरातील चार गावांसाठी हा पूल महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आमदार पवार यांच्याकडे करण्यात आली. लवकरच पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.
रविवारी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नांदणी नदीला पूर आला. पाण्याचा दाब तयार होऊन, पुलाला अवघ्या दोनच मोऱ्या असल्यामुळे संपूर्ण पूल वाहून गेला. – तानाजी काळे, ग्रामस्थ