राहाता : शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना काल, मंगळवारी उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे घडल्याने वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज, बुधवारी दुसरा बिबट्या जेरबंद झाला. परंतु शेतकऱ्यावर हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का, याबाबत खात्रीशीर माहिती न मिळाल्याने हल्ला करणाऱ्या बिबट्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही दिवसांपासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याने काल कारवाडी येथे शेतात काम करणारे मच्छिंद्र दगडू कालेकर यांच्यावर हल्ला करून जखमी केले. जवळच पत्नी आणि मुलगा असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. माहिती मिळताच वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले. आज संदीप होडगर यांच्या पोल्ट्रीशेजारील पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला, त्याला वन विभागाचे कर्मचारी घेऊन गेले. परंतु कालेकर यांच्यावर हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का, याबाबत खात्रीशीर माहिती मिळू न शकल्याने बिबट्याबाबत प्रश्नचिन्ह कायम राहिले. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उंबरी बाळापूर येथे १० ते १२ दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून संदीप होडगर या तरुण पशुपालकाच्या ११ मेंढ्यांसह काही कोंबड्यांचा फडशा पाडला. त्यामुळे त्यांचे ३.५ लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर वन विभागाच्या पिंजऱ्यात १० दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला. आज या परिसरात दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, याच परिसरात आणखी बिबटे असल्यामुळे पिंजरे लावून सर्व बिबटे जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पशुपालक मदतीपासून वंचित

सुमारे ३.५ लाखांचे नुकसान झालेल्या पशुपालक संदीप होडगर यांना आठवडा उलटूनही वन विभागाकडून भरपाई मिळालेली नाही. त्यांच्यासह जखमी मच्छिंद्र कालेकर यांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.