मळेवाड परबवाडीत सुमारे सात वर्षांचा बिबटय़ा फासकीत अडकला. त्याला वन खात्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्याचा प्रयत्न केला, पण प्रथम तो प्रयत्नही अयशस्वी ठरला. पण फासकीचा चाप सैल होऊन सुटला, तो बिबटा उभा राहून उडी मारण्याच्या तयारीत असतानाच सुदैवाने पिंजऱ्याच्या आतमध्येच घुसल्याने जेरबंद झाला. अन्यथा हा बिबटय़ा चवताळून बघ्यांच्या गर्दीवर हल्लाबोल करणार होता. त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सावंतवाडी ते आरोंदा रस्त्यावरील मळेवाड देऊळवाडीच्या नाल्याजवळ रानडुकरांच्या त्रासाला कंटाळून लावण्यात आलेल्या फासकीत ६ ते ७ वर्षांचा बिबटय़ा अडकला. फासकीचा चाप बिबटय़ाच्या समोरच्या डाव्या पायाला अडकला. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो असफल ठरला.
बिबटय़ा फासकीच्या चापात अडकला असून तो जिवंत असल्याचे कळताच शेकडो लोकांनी गर्दी केली. शेतकऱ्यांनी लावलेल्या फासकीच्या चापात समोरचा डावा पाय अडकल्याने वन खात्याने पिंजरा आणून त्याला पकडण्याची तयारी केली.
या वेळी वन खात्याचे वनपाल व वनरक्षक या कर्मचाऱ्यांशिवाय वनक्षेत्रपाल, उपवनसंरक्षक किंवा सहायक वनसंरक्षक दर्जाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. वनपाल व वनरक्षक यांनी पिंजरा आणला, पण बिबटा जेरबंद करण्यास वनकर्मचारी असफल ठरत असल्याने मळेवाडच्या कणखर लोकांनी बिबटय़ा जेरबंद करण्यास पुढाकार घेतला.
बिबटय़ा  दिसला त्यापासून तो जेरबंद होण्याचा कालावधी तब्बल साडेपाच तासांचा ठरला. एक ते दीड तास जेरबंद करण्यासाठी सर्वानीच फिल्डिंग लावली होती.
वनपाल चंद्रसेन धुरी, वनरक्षक कुमार खरडे, वनपाल रमेश कांबळे, जगताप अशा वनकर्मचाऱ्यांच्या बिबटय़ाला पकडण्याच्या प्रयत्नांना लोकांनी साथ दिली. रस्त्यावर शेकडो लोक जमा झाले होते. या बिबटय़ाला तिन्ही बाजूंनी लोकांनी घेरले होते.
जंगली डुक्कर शेती-बागायतीची नुकसानी करत असल्याने फासकीचा चाप शेतकऱ्यांनी लावला होता, त्यात तो अडकला.
 फासकीचा डाव्या पायाचा चाप बिबटय़ाच्या हालचालीमुळे सैल झाला. लोकांच्या गर्दीमुळे बिबटय़ा बावचाळला होता. सुमारे एक ते दीड तासानंतर डाव्या पायाचा चाप अचानक सैल होऊन बिबटय़ा दोन्ही पायावर उभा राहिला. तो आता पळण्याच्या तयारीत होता, पण लोकांची गर्दी झाली होती. त्याला पळण्याची दिशा मिळाली नाही, पण तरीही त्याने उडी टाकली, पण सुदैवाने बिबटय़ाची उडी थेट पिंजऱ्यातच पडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला. त्याची उडी पिंजऱ्याऐवजी जंगलाच्या दिशेने पडली असती तर काही लोक जखमी झाले असते किंवा धरपकडीत सिनेमासदृश स्थिती निर्माण झाली असती. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.