वाई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी (दि ११) रोजी येथील हरिहरेश्वर सहकारी बँक, वाई, (सातारा) या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेकडे व्यवहारासाठी पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक योगेश दयाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विशेष लेखा परीक्षक ,सहकारी संस्था सातारा,विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट २०२१ रोजी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर व संचालक वजीर कासमभाई शेख गुन्हा दाखल केला होता.
बँकेचेअध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,व्यवस्थापक,रोखपाल आणि तीन सनदी लेखापाल यांच्यासह २९ जणांनी संगनमताने ११२ कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून, तसेच बांधकाम केलेले सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून संबंधीताचे नावे कर्ज घेवून बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग व अपहार करुन बॅकेच्या सभासदाची व ठेवीदारांची एकूण रक्कम रु. ४२ कोटी ४६लाख ८९हजार ३४४ फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने नंदकुमार खामकर यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यापैकी पाच जणांची जामीनावर मुक्तता झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला असून कर्ज वसुलीचे काम सुरू आहे.दरम्यान ठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंत सुमारे ९९.९६ टक्के ठेवींची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून ८ मार्च २०२३ पर्यंत ५७.२४ कोटी रुपये ठेवीदारांना दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द करताना त्यांना ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई, ठेवी स्वीकारणे आणि ठेवी परत करण्यास बंदी घातली आहे. सहकार विभागानेही रिझर्व बँकेला बँकेच्या अनियमिततेबाबत व बँकेवर अवसायक नेमण्यात आल्याचे कळविले होते, त्याप्रमाणे रिझर्व बँकेने कारवाई केली आहे. या बँकेबरोबरच श्री शारदा महिला सहकारी बँक, तुमकूर, कर्नाटक या बँकेचाही परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.