मुंबई/नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही राज्याचा मतटक्का कमीच राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ११ मतदारसंघांत सरासरी ५२.४९ टक्के मतदान झाले असून देशाच्या तुलनेत ही टक्केवारी कमीच आहे. सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये नोंदविले गेले असून शिरूर मतदारसंघात मतटक्का सर्वांत कमी आहे.

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघांत किरकोळ अपवाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये राज्यातील २४ मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून सोमवारच्या मतदानाचा कल पाहता चौथ्या टप्प्याची आकडेवारीही याच आसपास राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, शरद पवार गटाचे उमेदवार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह एकूण २९८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले आहे. भाजपचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये तर वंचितचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी शिरूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा >>> प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”

पुण्यात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, सलील कुलकर्णी आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या नावे बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. ‘‘सेंट मिरा शाळेतील मतदानकेंद्रावर पोहोचल्यानंतर माझ्या नावे आधीच मतदान झाल्याचे लक्षात आले. माझ्या नावापुढे दुसऱ्याच कुणीतही स्वाक्षरी केली होती,’’ असा दावा शिंदे यांनी केला. त्यानंतर आवश्यक अर्ज भरल्यानंतर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली असून याबाबत ऑनलाईन तक्रारही दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

●चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९६ मतदारसंघांत पाच वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले.

●आंध्र प्रदेश आणि बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांत कमी (३५.७५ टक्के) तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (७५.६६ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे.

●आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतांची टक्केवारी : ●नंदुरबार : ६०.६० ●जालना : ५८.८५ ●बीड : ५८.२१ ●रावेर : ५५.३६ ●छत्रपती संभाजीनगर : ५४.०२ ●अहमदनगर : ५३.२७ ●शिर्डी : ५२.२७ ●जळगाव : ५१.९८ ●मावळ : ४६.०३ ●पुणे : ४४.९० ●शिरूर : ४३.८९ (संध्या. ५ पर्यंत)