Maharashtra News Live Updates Today : राज्यसभा निवडणुकीबाबत आपल्याला शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याचे ठरले होते आणि त्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द फिरवला. त्यांनी शब्द का मोडला हे कळत नाही, असा संताप संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक लढणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

तर प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

22:21 (IST) 28 May 2022
पाहुणा म्हणून आला अन् दागिने चोरून गेला; नागपुरातील महिलेसोबत घडला विचित्र प्रकार

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. घरी आयोजित केलेल्या पार्टीसाठी आलेल्या एका पाहुण्याने फिर्यादीच्या घरातून दोन लाखांचे दागिने चोरून पळ काढला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर बातमी

21:52 (IST) 28 May 2022
‘…तर विदर्भातील कापूस थेट बांगलादेशात पाठवला जाईल’ – नितीन गडकरी

पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. त्याला सिंचनाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. सिंचन क्षेत्राच्या सक्षमीकरणाची गरज आहे. अमृत सरोवर योजनेतून जलसमृद्धी होऊ शकते. ५० टक्के क्षेत्रावर सिंचन निर्माण झाले तरी एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले. सविस्तर बातमी

21:25 (IST) 28 May 2022
पुणे: ‘वीजबिल भरल्याशिवाय…’ अजित पवारांचं जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत मोठं विधान

विजेची मागणी वाढत असताना त्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्यात येत आहेत. मात्र, वीजबिलांची वसुली न झाल्यास सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आर्थिक अडचणी येतात. महावितरण कंपनीची स्थिती सध्या अशीच आहे. त्यामुळे वीजबिलाचा भरणा करण्याशिवाय तरणोपाय नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री आणि जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली. सविस्तर बातमी

20:38 (IST) 28 May 2022
BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली, केंद्रात सचिव पदावर झाली नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. असं असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची अचानक बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी

19:58 (IST) 28 May 2022
राज्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस, मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला, तरी ते दोन-तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

19:46 (IST) 28 May 2022
बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकऱ्यांच्या हिताचे- खासदार शरद पवार

बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे आहे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथे बोलताना व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे साखर कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खा. पवार बोलत होते. सविस्तर बातमी

19:14 (IST) 28 May 2022
‘…तर परिस्थिती आणखी बिघडेल’, जर्मनी आणि फ्रान्सच्या नेत्यांना पुतीन यांचा इशारा

मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अमेरिकेनं रशियाविरोधी कठोर धोरण स्वीकारलं होतं. तर रशियानं आक्रमण केल्यानंतर काही दिवसातच युक्रेन युद्धात हार पत्करेल असं सर्वांना वाटत होतं. पण युक्रेनिअन सैन्य आणि नागरिकांनी आपल्या मायभूमीसाठी चिवट लढा देत रशियाला जेरीस आणलं आहे. सविस्तर बातमी

19:06 (IST) 28 May 2022
भंडारा कारागृहात किरकोळ वादातून कैद्यांमध्ये तूफान राडा; ८ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

भंडारा कारागृहातील उपहार गृहात खरेदी दरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून कैद्यांच्या दोन गटात तूफान मारहाण झाल्याची घटना भंडारा जिल्हा कारागृहात घडली . याप्रकरणी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांच्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात ८ कैद्यांविरोधात आज शनिवार दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीत मोक्काच्या आरोपींचा समावेश आहे.

वाचा सविस्तर…

19:05 (IST) 28 May 2022
प्रसिद्ध YouTuber निघाला अट्टल चोर; ओळख लपवण्यासाठी घालायाचा टोपी आणि मास्क

मुंबईत एका ३० वर्षीय सुप्रसिद्ध युट्यूबरला घर फोडीच्या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. विनोबा भावे नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या ताब्यातून १४ मोबाईल फोन, धारदार शस्त्रे, बनावट दागिने तसेच विदेशी चलन जप्त करण्यात आले. अभिमन्यू गुप्ता यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० (घरात चोरी) यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर…

18:02 (IST) 28 May 2022
नागपूर : राणा दांपत्याच्या ‘हनुमान चालीसा’ पठणला भाजपची रसद ? रामनगरच्या हनुमान मंदीरात कार्यक्रम

उपराजधानीतील रामनगर चौकातील हनुमान मंदीर परिसरात शनिवारी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आणि त्यानंतर राणा दांपत्याने राज्य सरकार विरोधात विविध आरोप करत हनुमान चालीसा पठण करून प्रार्थना केली. राणाच्या कार्यक्रमादरम्यान तेथे बजरंगदल आणि भाजपचे काही कार्यकर्ते उभे असल्याचे बघत त्याला भाजपची रसद तर नाही ना? अशी चर्चा रंगली होती.

सविस्तर बातमी…

17:25 (IST) 28 May 2022
अमरावती : राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अमरावती आगमनाच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली असतानाच शिवसेनेने ठिकठिकाणी पोस्टर लावून राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे शहरात राणा दाम्पत्य आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राणा दाम्पत्याचे शनिवारी सायंकाळी अमरावतीत आगमन होत आहे.

‘३६ दिवस पाखडले, काहीच नाही सापडले’ अशा शब्दात राणा दाम्पत्याच्या मुंबई, दिल्ली वारीची खिल्ली शिवसेनेने उडवली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख पराग गुडधे यांनी पोस्टरद्वारे राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.

वाचा सविस्तर…

17:20 (IST) 28 May 2022
पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

भरधाव मोटारीने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक दिल्याची घटना वानवडीत घडली. अपघातात पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून पती जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली. विश्वंभरी नरेंद्रसिंग नेगी (वय ६०, रा. तात्या टोपे सोसायटी, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात नरेंद्रसिंग नेगी (वय ६३) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत नेगी यांचा मुलगा डॅा. पंकजसिंग नेगी (वय ३२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

17:19 (IST) 28 May 2022
“घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही”; छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे. शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता असेही शाहू महाराज म्हणाले. वाचा सविस्तर…

16:46 (IST) 28 May 2022
आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (२९ मे) होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. वर्धा येथे ५५ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर, गेल्या अकरा वर्षांत विदर्भामध्ये होणारे हे तिसरे संमेलन असेल.

वाचा सविस्तर…

16:42 (IST) 28 May 2022
आता दळणही महागणार; १ जूनपासून नवीन दर होणार लागू

मागील काही काळापासून देशात महागाई वाढतच चालली आहे. इंधानाचे दर गगनाला भीडत असताना, खाद्य पदार्थ्यांच्या महागाई दराने सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. यानंतर आता चपाती किंवा भाकरी यासाठी आवश्यक असणारं पीठही महाग होणार आहे. सविस्तर बातमी

16:15 (IST) 28 May 2022
२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून गायब; गेल्या आर्थिक वर्षात १२.६ टक्क्यांची घट, RBI चा खुलासा

२०१६ साली नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं २००० रुपये किमतीची नवीन नोट चलनात आणली होती. पण मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं निरीक्षण नुकतंच आरबीआयने नोंदवलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत. सविस्तर बातमी

16:00 (IST) 28 May 2022
अमोल मिटकरी इतिहास विकून विधान परिषदेवर आले; सदाभाऊ खोत यांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, त्यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला होता. याबाबत विचारलं असता सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर पलटवार केला आहे. सविस्तर बातमी

15:59 (IST) 28 May 2022
आम्ही महात्मा गांधी आणि सरदार पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकोट येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं की, गेल्या आठ वर्षांत आम्ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षात आम्ही असं एकही काम केलं नाही, ज्यामुळे लोकांची मान शरमेनं झुकेल. सविस्तर बातमी

15:45 (IST) 28 May 2022
राज्यातील ६० लाख महिलांना एक रुपयामध्ये दहा सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

राज्यातील दारिद्ररेषेखाली ६० लाख महिलांना एक रुपया नाममात्र किमतीमध्ये दरमहा दहा सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त या योजनेची अंमलबजावणी १५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे,अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. २८ मे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही घोषणा केली आहे.

15:09 (IST) 28 May 2022
“राज्यात काही लोक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याला…”, गृहमंत्र्यांचा सूचक इशारा!

राज्यामध्ये गंभीर परिस्थिती काही नाही. राज्यामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात आहे. परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करतात पण त्याला कसं पुरुन उराचयं याचे मार्गदर्शन शरद पवारांमुळे आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे

14:58 (IST) 28 May 2022
जयंत पाटील म्हणतात, “आता आपण हनुमान चालीसा म्हणतो आणि तुम्ही म्हणताय…!”

सांगलीत स्थानिक ग्रामस्थांची चर्चा करताना एका ग्रामस्थाने माकडांचा उच्छाद असल्याची तक्रार केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!

वाचा सविस्तर

14:30 (IST) 28 May 2022
नवनीत राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

३६ दिवसांनंतर जेव्हा आम्ही नागपूरमध्ये येतोय, मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी ठेवली आहे. आम्हाला आतमध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं. देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का आहे? उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

वाचा सविस्तर…

12:30 (IST) 28 May 2022
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण आगीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक; प्रवासी थोडक्यात बचावले

संगमनेर तालुक्याच्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज सकाळी टेम्पो ट्रॅव्हल बसने अचानक पेट घेतला. शिर्डीवरुन संगमनेर मार्गे भीमाशंकरला दहा प्रवाशांना घेत ही बस जात होती. अचानक आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला घेतली व प्रवाशांना बस मधून खाली उतरण्याची सुचना केली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही वेळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

12:00 (IST) 28 May 2022
समीर वानखेडे तपास यंत्रणांमधील एक पोपट होता आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही – नाना पटोले

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले. त्यानंतर आताक्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला असल्याचे समजते. याबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…

11:05 (IST) 28 May 2022
सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी

सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या अपघात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली आहे.

10:32 (IST) 28 May 2022
करोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता – अस्लम शेख

करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर…

08:59 (IST) 28 May 2022
पंतप्रधान मोदी यांनी स्वप्ने अनेक दाखविली, पण वास्तव वेगळे; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्ने अनेक दाखविली, पण प्रत्यक्ष जगतानाचे वास्तव मात्र वेगळेच आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. खासदार सुळे येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर…

08:59 (IST) 28 May 2022
शिवसेनेला अनंत गीतेंचा विसर पडला

लोकसभेत शिवसेनेचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे, केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचा पदभार सांभाळणारे, अनंत गीते सध्या विजनवासात गेले आहेत. जुन्या नेत्यांना बेदखल करून नव्या नेत्यांनी संधी देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. त्यामुळे गीतेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसंपर्क अभियानापासून गीतेंना दूर ठेवण्यात आले आहे. वाचा सविस्तर…

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.