मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून ते शुक्रवार १२ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या उभय सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवनात शुक्रवारी झालेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय, मुख्यमंत्री..”
बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरचित्र संवादाच्या माध्यमातून) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनात एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जूनला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असेही बैठकीत ठरविण्यात आले. विद्यामान विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असेल.