अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘शत प्रतिशत भाजप’चा नारा देतानाच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनला संपताच लगेचच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सूतोवाचही केले आहे. भाजपच्या मंडलाध्यक्षांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा नगर शहरात आज, सोमवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (शहर), दिलीप भालसिंग (दक्षिण) व नितीन दिनकर (उत्तर), युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय अक्षय कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अरूण मुंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडलाध्यक्षांनी प्रत्येक प्रभागाच्या रचनेसाठी चौघांची समिती करावी, त्यांच्यामार्फत प्रभाग रचनेचा अभ्यास करावा, म्हणजे प्रभाग रचनेच्या वेळी पक्षाला त्याचा उपयोग होईल, अशी सूचनाही मंत्री विखे यांनी केली. कार्यशाळेनंतर मंडलाध्यक्षांची त्यांनी स्वतंत्र बैठक घेत सूचनाही केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने आपण कार्यकर्त्यांना बळ देण्यास कमी पडणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली.

दोन्ही ठाकरे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तरी अडचण नाही

दोन्ही ठाकरे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याची चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये. ते एकत्र आले काय किंवा बाजूला राहिले काय, आपल्याला काही अडचण नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी सक्षम आहेत. आपला एकच नेता आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. अवांतर गोष्टींची चिंता करू नये, असेही आवाहन मंत्री विखे यांनी केले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना दीड कोटी सदस्य असलेल्या भाजप पुढे ते काय आव्हान उभं करू शकणार, असाही प्रश्न विखे यांनी केला.

शहरातील पदाधिकारी गैरहजर

कार्यशाळेस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र नगर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व मंडलाध्यक्षांनी कार्यशाळेकडे पाठ फिरवली. नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नियुक्तीला आक्षेप असल्याने हे जुने पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याची चर्चा होत होती. कार्यशाळेस उपस्थित एका माजी नगरसेवकाने तर कार्यशाळेला अनुपस्थित राहण्याचे दूरध्वनीही केले गेल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारांचीही अनुपस्थिती

कार्यशाळेस भाजपचा एकही विद्यमान व माजी आमदार उपस्थित नव्हता. आमदार विक्रमसिंह पाचपुते उपस्थित होते, मात्र मंत्री विखे यांच्या आगमनापूर्वीच ते नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याकडे रवाना झाले.