मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जनजागृतीसाठी मनोज जरांगे यांनी शांतता फेरी काढली. या शांतता फेरीची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी भाष्य करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना एक खोचक सल्ला दिला आहे. “मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडून आता शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. (Sadabhau Khot On Maratha Reservation)
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“रयत क्रांती संघटनेला यावेळीही भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान करून मला संधी दिली. शेवटी आम्ही एका कुटुंबातील आहोत. आम्ही कधीही विचार सोडलेला नव्हता. आम्ही तत्व सोडलेले नव्हते. कोणत्याच पक्षाने घटक पक्षाला येवढा मोठा सन्मान दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर, विनायक मेटे यांना विधानपरिषद दिली होती. तसेच मलाही दुसऱ्यांदा विधानपरिषद दिली. त्यामुळे विस्तापित वर्गाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
हेही वाचा : बारामतीच्या जनसन्मान सभेत भुजबळ यांचा आरोप; आरक्षणावरून भांडणे लावण्याचा प्रयत्न
“आरक्षणाच्या प्रश्नावर माझी भूमिका मी वेळोवेळी मांडली आहे. राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की ओबीसींचं आरक्षण कोणालाही जाणार नाही. मराठा समाजाला सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे. ते सरकारने टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्यात कायम राहू शकतं. आता दुसऱ्या बाजूला जो काही गदारोळ चालला आहे. कोणी उठावं आणि आंदोलन करावं. पण कोणतंही सरकार सत्तेत आलं तरी कोणाच्याही आरक्षणामध्ये दुसऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
खोत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाने राजकारण केलं जात आहे. एखाद्या जातीचा विषय घेतला की नेता होता येतं. मात्र, खऱ्या अर्थाने समाजाला पुढे घेऊन जायचे असेल तर दिर्घकालिन लढाई लढावी लागते. आता लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्यांवर मतदान झालं. विरोधकांकडून सांगितलं गेलं की भाजपा आरक्षणाला विरोध करत आहे. आता विरोधकांनी लेखी द्यावं की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही लिहून द्यावं”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जाहीर करावं. ते जर तसं जाहीर करणार नसतील तर मी मनोज जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि भाजपाचा पिच्छा त्यांनी सोडावा आणि बारामतीच्या दिशेने तुमचा मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटलं आहे.