देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारासाठी मनसेही प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.
“ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल. मी याबाबत जास्त काही बोलत नाही. राजकारण करा, परंतु नेरिटीव्ह सेट करू नका. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार हे पाहत आहोत. एवढ्या राजकीय घटना घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही”, असे आमदार राजू पाटील म्हणाले.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
हेही वाचा : “ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
“घराशेजारी शपथविधी होता, तेव्हा सांगितलं नाही. तुम्ही राजकारण करा, मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊन बोलू नका. अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे. तुम्ही विचारणार नाही, मग आमचे राजकारण आम्ही करू नये का? त्यामुळे राज ठाकरेंनी आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी हा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा असेल किंवा विधानसभा आम्हाला विचारले, समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोलत आहे”, असे आमदार राजू पाटील म्हणाले.
मनसे महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसेचे नेतेही प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात राजू पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. कल्याण आणि भिवंडीमध्ये मेळावे घेण्यात येणार असल्याचे संकेत राजू पाटील यांनी दिले आहेत.