कराड : पुणे- बंगळूरू महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे कोल्हापूरहून कराड शहरात येणाऱ्या वाहनांसाठी रोखण्यात आलेला कोल्हापूर नाका येथील मार्ग खुला करावा, या प्रमुख मागणीसह ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी गेले असतानाही ठेकेदाराकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे आरोप करत या विरोधात मनसेच्यावतीने भरपावसात ठिय्या व बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अचानक आक्रमक आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या संबंधित अधिकारी व ठेकेदाराने हलक्या वाहनांसाठी तातडीने कोल्हापूर नाका खुला करून दिला.
कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे लोकांना होणारा त्रास व अपघात याविरोधात ‘मनसे’चे तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांच्या पुढाकाराने कोल्हापूर नाका येथे भरपावसात खड्ड्यासमोर बसून करण्यात आलेल्या या आंदोलनात संभाजी चव्हाण, संजय मंडले, शंभूराज भिसे, संजय डिसले, सोनू जाधव, आकाश नलवडे, अरुण मदने, सनी पाटोळे आदी सहभागी झाले होते. त्यात परिसरातील रिक्षाचालकही सहभागी झाल्याने हे आंदोलन अधिक आक्रमक बनले.
कराड शहरात येण्यासाठी दुचाकी, रिक्षा अथवा हलक्या वाहनांना वारूंजी फाट्यावरुन जुन्या कोयना पुलावरून किंवा पुन्हा कोल्हापूर नाक्यावर येऊन कराड शहरात यावे लागते. याबाबत यापूर्वी ‘मनसे’ने आंदोलन करून कोल्हापूर नाक्यावरून थेट शहरात येणारी वाहतूक सुरू केली होती. मात्र, ठेकेदाराने पुन्हा ही वाहतूक बंद केल्याने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता शाळा सुरू झाल्याने याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला. कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी हे आंदोलन असल्याने कोल्हापूर नाक्यावर रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकही त्यात सहभागी झाले.
अखेर अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांशी चर्चा केली. कोल्हापूर नाक्यावर लावलेले सिमेंट काँक्रिटचे ब्लॉक हटवून हलक्या वाहनांसाठी शहरात येण्याची वाट मोकळी केली. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.