नांदेड : ज्येष्ठ कार्यकर्ते बी.आर. कदम यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेस पक्षातील ग्रामीण विभागाच्या दोन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या उपस्थितीतच स्थानिक वाद उफाळून आले.
मागील सव्वा वर्षापासून काँग्रेस पक्ष संघटनेत ‘प्रभारी राज’ सुरू आहे. अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी पक्ष सोडल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी हनमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि बी.आर. कदम यांना ग्रामीण विभागाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष केले होते. पण मधल्या काळात ग्रामीणसाठी एकच जिल्हाध्यक्ष असावा, असा सूर पक्षातील एका गटाने लावला होता.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ २८ तारखेला येथे आले होते. त्यांनी येथील परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर निरीक्षक काळे यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयात भेट देऊन इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली. ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाध्यक्ष कायम ठेवण्याचा आग्रह निरीक्षकांसमोर धरण्यात आला. दरम्यान, पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावरच ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी लेखी मागणीही प्रमुख कार्यकर्त्यांनी केली.
सुमारे तीन-चार तास कार्यालयात थांबून खा. काळे आणि जिल्ह्याचे प्रभारी तुकाराम रेंंगे पाटील यांनी येथील परिस्थितीचा अंदाज घेतला. राजेश पावडे, विठ्ठल पावडे, सुभाष किन्हाळकर, महेश देशमुख प्रभृतींनी उत्तर जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी मुलाखत दिली. दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी बेटमोगरेकर कार्यरत असले, तरी त्या भागातूनही काहींनी मुलाखत दिली. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर खाासदार रवींद्र चव्हाण, यशपाल भिंगे, निरीक्षक खासदार कल्याण काळे यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.