अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देतोय असं मत व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांनी म्हटलं की, "मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये". आणखी वाचा- “शंका निर्माण होण्याची संधी…”, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांनी केलं भाष्य दरम्यान कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम हातोडा चालवला. महापालिकेच्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त करत पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे. तसंच पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा उल्लेख बाबरची सेना असा केला. आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने आज सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला. आणखी वाचा- ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’ पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली असून उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं आहे.