Maharashtra Government Mumbai Latest News: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर अर्ध्या तासातच फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांना नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहिती होती का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला वाटत नाही. आम्ही टीव्हीवरच त्यांनी राजीनामा दिल्याचं पाहिलं. त्यांनी आधी सूतोवाच केलं होतं का याची माझ्याकडे माहिती नाही”.

अखेर राजीनामा; बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्र्यांकडून पदत्याग : महाविकास आघाडी सरकार कोसळले

“मी त्यांच्यासोबतच टीव्ही पाहत होतो. उद्धव ठाकरेंचं भाषण पाहूनच ते राजीनामा देणार असल्याचं लक्षात आलं होतं,” असंही त्यांनी सांगितलं. सरकार पडणं आणि महाविकास आघाडी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“पक्ष सोडून गेलेले किंवा जाणारे यांच्या अपात्रतेसंदर्भात पुढे काय होतं हे माहिती नाही. पण कायदेशीररित्या पाहिलं तर संख्याबळ दोन तृतीयांश झाल्यानंतरही तुम्ही पक्ष सोडू शकत नाही. सगळे सोडून गेले आणि फक्त एक आमदार शिवसेनेसोबत असला तरी ते पक्ष सोडू शकत नाहीत. आमदार राहायचं असेल तर त्यांनाही शिवसेनेत थांबावं लागेल,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“भाजपाचा यामध्ये काही हात नसल्याचं आम्हाला वाटलं होतं. पण काल पेढे भरवताना पाहिलं तेव्हा यामागे कोण आहे याचा अंदाज आला,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. “आम्ही सगळे एका विचाराने एकत्रितपणे राहिलो तर महाविकास आघाडी कायम राहायला हरकत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. गेल्याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारने निम्मा म्हणजे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचेच आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.