अलिबाग- यंदा उत्तर कोकणात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. तर दक्षिण कोकणात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. तर रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सरासरची पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. त्यातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. यंदा मात्र या दोन जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्याती सरासरीच्या तुलनेत ७६ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या उलट रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. रायगड जिल्ह्यात १०२ टक्के, ठाणे जिल्ह्यात १११ टक्के तर पालघर जिल्ह्यात १२३ टक्के पाऊस पडला आहे.
जून महिन्यात पालघर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे ३२९ मिलीमीटर असते, त्या तूलनेत २४ जून पर्यंत जिल्ह्यात ४०६ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्याचे जून महिन्याचे पर्जन्यमान ३६९ मिमी आहे. तिथे ४११ मिमी पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ५२४ मिमी पाऊस पडतो तिथे २४ जून पर्यंत ५३८ मिमी पाऊस पडला आहे. महिना संपायला आणखिन एक सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण अजून वाढणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात २४ जून पर्यंत साधारणपणे ६५० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र तिथे ६१० मिमी पावसाची नोंद झाली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जून पर्यंत ७०४ मिमी पावसाची नोंद होत असते. तिथे ५३४ मिमी पाऊस पडला आहे. राज्य सरकारच्या महारेन या संकेत स्थळावरील आकडेवारी नुसार यंदा दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणातील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा पॅटर्न बदलला असल्याचे दिसून येत आहे.