पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून १६ जुलैपर्यंत विठुरायाचे दर्शन २४ तास खुले राहणार आहे. देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला. तसेच, विठ्ठल २४ तास दर्शनासाठी उभा राहणार असल्याने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला कापसाचा मऊ लोड लावण्यात आला असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे.

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून देव २४ तास उभा असतो. या कालावधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्याआधी विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. या वेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या-गिरद्यादेखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या.

देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी अविश्रांत उभा राहणार आहे.

विठ्ठलाच्या व रुक्मिणीमातेच्या पाठी मऊ कापसाचा लोड ठेवण्यात आला आहे. तो लावल्याने देवाला शीणवटा येत नाही, अशी भावना वारकरी संप्रदायाची आहे. आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांची वारी निर्विघ्न पार पडू दे, अशी प्रार्थना या वेळी औसेकर महाराज यांनी केली.

देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज, पायावर ५० हजार, तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. या काळात व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन बंद राहणार असल्याचे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे असतील विठुरायाचे नित्यक्रम

पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त तासभर दर्शन बंद असेल. त्यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू-पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.