परभणी : गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जांभूळबेट हे जिल्ह्यातील पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरणार असून आता जांभूळबेटाच्या विकासासाठी खासदार संजय जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून सोमेश्वर ते जांभुळबेट हा मुख्य रस्ता तसेच जांभूळ बेटावर पेव्हर ब्लॉक, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, शेड आदि सुविधांसाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे. चहूबाजूंनी अथांग जलाशय आणि गर्द झाडीत निरव शांतता जपणारे जांभुळबेट आता पर्यटकांना नव्याने साद घालणार आहे.
शहरातला सर्व गोंगाट विसरून निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर परभणी जिल्ह्यात जांभूळ बेट हे उत्तम ठिकाण आहे. गोदावरीच्या पात्रातून बोटीने प्रवास करून जांभूळ बेटावर जावे लागते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर सारे भान हरपून माणूस या निसर्गाच्या सहवासात रमतो. पूर्वी हे बेट म्हणजे तब्बल २७ एकराचा भूभाग होता आता मात्र चहूबाजूंनी पाण्यामुळे होणारी झीज लक्षात घेता ते आता २० एकरावर आले आहे. या ठिकाणी पशु पक्ष्यांचे आवाज, विशेषतः मोरांचे केकावणे सतत कानी पडते. सकाळी आणि सायंकाळी मोरांचे विलोभनीय दर्शन घडते.
जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध असे हे ठिकाण आहे. घनदाट झाडी आणि चहूबाजूंनी पसरलेले पाणी या पार्श्वभूमीवर इथला सूर्योदय आणि सूर्यास्त अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. या बेटावर पोहोचताच जांभळाची खूप जुनी झाडे पहावयास मिळतात, त्यामुळेच त्याला जांभुळबेट हे नाव पडले आहे. या बेटावर निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा अनुभव येतो. बेटाच्या सर्व बाजूने पाणी असल्याने या ठिकाणाचे तापमान हे सुसह्य असते. पूर्वी गोदावरी नदीच्या पात्रातून बेटापर्यंत पायी पोहोचता येत असे. आता जिल्ह्यात गोदावरीच्या पात्रात बंधाऱ्याद्वारे पाणी अडवल्यामुळे चहूबाजूनी असलेला विस्तीर्ण जलाशय हा पशुपक्ष्यांनाही मोहवणारा आहे. या नितांत रमणीय अशा ठिकाणाची आजवर उपेक्षाच झाली मात्र गेल्या काही वर्षात हे बेट पुन्हा चर्चेत आले. त्या पाण्यावर विहार करणारे पक्षी, बेटावरच्या वृक्षवेली, बेटावर असलेल्या नागमोडी पायवाटा यामुळे आता पर्यटकांची पाऊले पुन्हा जांभूळ बेटाकडे न वळली तरच नवल !
गेल्या पाच वर्षापासून जांभुळबेट संवर्धन मोहिमेच्या कामाला सुरुवात झाली. या बेटावर जाण्यासाठी नियमित बोट लागणार होती, त्यामुळे जांभूळबेट संवर्धन समितीने लोकसहभागातून एक बोट आणि दहा लाईफ जॅकेट्स खरेदी करून त्याचे लोकार्पण यापूर्वीच केले आहे. त्यामुळे अतिशय माफक दरात बेटावर जाण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध झाली आहे. या कामी कृषिभूषण कांतराव देशमुख आणि तेथील स्थानिक तरुणांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे.
विकसित जांभुळबेट पर्यटकांसाठी पर्वणी
नैसर्गिक अशा जांभूळबेटाचा विकास झाला तर नक्कीच तेथील पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. बेटावर जाण्यासाठी सुरक्षित अशी सुविधा, प्रसाधनगृह, अल्पोपहार अशा व्यवस्था, देखभालीची यंत्रणा या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. जिल्ह्यात काही मोजकी पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांचा सर्वांगीण विकास झाला तर नक्कीच परभणी जिल्ह्यात अन्य ठिकाणाहून पर्यटक येतील. जांभूळबेट हे ठिकाण परभणीसह हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना जवळचे आहे. जेव्हा या बेटाची ख्याती वाढू लागेल तेव्हा सुट्ट्यांच्या काळात मराठवाड्याच्या बाहेरूनही लोक यायला लागतील. जांभूळबेटाचा सर्वांगीण विकास करताना जांभूळबेटाच्या निसर्ग सौंदर्याला कुठेही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कृषीभूषण कांतराव देशमुख, झरीकर