परभणी : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुखच नाहीत. दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या जागा काही महिन्यांपासून रिक्त असून ही बाब पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सेनेच्या संघटनात्मक पद्धतीत कार्यकर्ते व पक्ष यांच्यात दुवा असणारे संपर्क प्रमुखपदही रिक्त असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी ही सर्व पदे नियुक्त केली जातील काय याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे परभणीत वर्चस्व असल्याने हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे दोघेही लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या पडझडीच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिले. फाटाफुटीच्या काळात सेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिला. पण विधानसभा निवडणुकीपासून या पक्षाला जिल्हा प्रमुखपदच नाही. विशाल कदम आणि संजय साडेगावकर हे दोघे या पक्षाचे जिल्हाप्रमुख होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान साडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीची कास धरली. तर निकालानंतर विशाल कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. सेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख पक्ष सोडून गेल्याने ही पदे रिक्तच आहेत.
शिवसेनेच्या संघटनात्मक पद्धतीत संपर्कप्रमुखपद हेही महत्त्वाचे मानले जाते. सुभाष भोयर हे संपर्कप्रमुख होते. जिल्ह्याची पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व यांच्यात दुवा म्हणून या पदाकडे पाहिले जाते. हे संपर्कप्रमुख शक्यतो मुंबईतलेच नेमले जातात. परभणी जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कप्रमुखच नाही. पूर्वी सहसंपर्कप्रमुख हे एकच पद होते पण आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एका सहसंपर्कप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विवेक नावंदर (परभणी), प्रा. पंढरीनाथ धोंडगे (पाथरी), सुधाकर खराटे (गंगाखेड), गंगाप्रसाद घुगे (जिंतूर) असे पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय चार सहसंपर्कप्रमुख आहेत. मात्र अजूनही पक्षाला जिल्हाप्रमुखपद भरता आले नाही.
आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा आहे. परभणी महानगरपालिकेसह जिल्ह्यातील अन्य पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना ‘उबाठा’ पक्षाचे दोन्ही जिल्हाप्रमुखपद रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्ष या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करणार काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पक्षीय पातळीवर लवकरच निर्णय होईल
विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही जिल्हाप्रमुख पक्ष सोडून गेल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. पक्षीय पातळीवरून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. येत्या दोन आठवड्यात या नियुक्त्या जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. – आमदार डॉ. राहुल पाटील, परभणी.