शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजनान कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. गजानन कीर्तिकरांनी शनिवारी प्रेसनोट प्रसिद्ध करून त्यात रामदास कदमांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. याला रामदास कदमांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

रामदास कदम म्हणाले, “दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे पक्षासाठी भूषणावह नाही. कीर्तिकरांचं वय ८० ते ८५ वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कीर्तिकरांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण, कुठलाच वरिष्ठ नेता प्रेसनोट काढत नसतो.”

हेही वाचा : शिंदे गटात वादाची ठिणगी! गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा ‘गद्दार’ म्हणून केला उल्लेख; म्हणाले…

“कांदिवलीत मी केलेल्या कामांवरती कीर्तिकर निवडून आलेत”

“१९९० मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून विधानसभेचं तिकीट दिलं होतं. केशव भोसले यांच्याबरोबर माझ्याविरोधात दाऊद होता. दाऊदविरोधात लढून मी निवडून आलो. मी खेडमध्ये उमेदवार असताना यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो? उलट कांदिवलीत मी केलेल्या कामांवरती कीर्तिकर निवडून आलेत. म्हणजे गजानन कीर्तिकर किती बेईमान आहेत. कीर्तिकरांना हे शोभत नाही. ३३ वर्षांनी माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढत आहेत,” असं म्हणत रामदास कदमांनी कीर्तिकरांचा निषेध केला.

“पितळ उघड पडल्याने पित्त खवळलं”

“उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून २००९ साली अनंत गितेंनी माझा पराभव केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला अनंत गितेंचं काम करणार नसल्याचं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं. गद्दारीची औलाद आमची नाही, ती गजानन कीर्तिकरांची असेल. मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षाशी बेईमानी करण्याचं काम कीर्तिकर करत आहेत. यांचं पितळ उघड पडल्याने पित्त खवळलं आहे. घरची भांडण घरातच मिटली पाहिजे होती. मात्र, अशाप्रकारे शिमगा करून पक्षाची इज्जत घालवण्याचं काम सुरू आहे,” असा हल्लाबोलही रामदास कदमांनी कीर्तिकरांवर केला आहे.

हेही वाचा : शिंदे गटात वचक ना नेत्यांवर, ना आमदारांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमचं आणि मुलाचं कार्यालय एकच”

“नारायण राणे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याविरोधात मी एकटा लढत होतो. तेव्हा कीर्तिकर घरी बसले होते. आता गद्दार कुणाला बोलत आहात? तुमचं आणि मुलाचं कार्यालय एकच आहे. तुमचा निधीही मुलगा वापरत आहे. तुम्ही अर्ज दाखल करून घरी बसणार आणि मुलाला ठाकरे गटाकडून निवडून आणणार,” असा आरोपही रामदास कदमांनी कीर्तिकरांवर केला आहे.