Ramdas Kadam On Uddhav Thackeray : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर दावा केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना (ठाकरे) आणि शिवेसना (शिंदे) या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा या संदर्भात मोठं भाष्य करत आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं. ‘मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावं’, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“माझ्या सारखा मातोश्रीवर राहिलेला माणूस असं का बोलतो? याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं. मी आज उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या संदर्भात बोला, मग मी तुम्हाला उत्तर देईन. अंबादास दानवे यांच्या सारख्यांना मी निवडून आणलेलं आहे. माझ्यामुळे आमदार म्हणून बसले आहेत. मग ते मला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना काय शिकवणार? बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आजही मी जेव्हा पुजेला बसतो तेव्हा मी बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेतो. मात्र, माझ्या सारख्या व्यक्तीला अशा प्रकारचं का बोलावं लागतं? यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर यावं आणि हिंमत असेल तर असं काही घडलं नाही म्हणून सांगावं”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

“दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची उद्धव ठाकरे यांची सवय आहे. उद्धव ठाकरे हे दिसतात तसे नाहीत, ते कपटी आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, हे मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो आहे. मग यावर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊद्या. मी आज हे देखील स्पष्ट करतो की मी कधीही खोटं बोललो नाही. मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना बोललो होतो की शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा. तेव्हा उद्धव ठाकरे मला म्हणाले होते की मी त्यांच्या (बाळासाहेब ठाकरे यांच्या) हातांचे ठसे घेऊन ठेवलेत. हे संभाषण आमच्या दोघांमधील (उद्धव ठाकरे आणि रामदास कदम) आहे. आता उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला?”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्राच्या जनतेला हे कळू द्या की वास्तव काय आहे? दुसऱ्या कोणी माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही. उद्धव ठाकरे यांची हिंमत असेल तर त्यांनी थेट माझ्यावर बोलावं, मी उत्तर देईल. किंवा आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट करा, त्यासाठी माझी तयारी आहे. तेव्हा दोन दिवस तर कोणालाही मातोश्री एन्ट्री नव्हती. खरं तर अशा घटनेत डॉक्टर माहिती देत असतात. पण तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानाबाबत मला माहिती देण्याचं सांगण्यात आलं. मी घाबरणारा माणूस नाही, पण एवढंच आहे की ही गोष्ट मी एवढ्या दिवस बोललो नाही हे मलाही मान्य आहे. मात्र, काल मी भाषण करताना ओघा-ओघात ते बोलून गेलो. उद्धव ठाकरे हे ज्या प्रकारे दिसतात ते त्या प्रकारे नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेलाही कळूद्या. वाघाच्या कातड्याचा मुखवटा त्यांनी घातला आहे पण ते वाघ नाहीत, त्यामुळे मी ते बोलून गेलो”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.