राजेश टोपे यांची माहिती
जालना : सध्या करोना विषाणूबाधितांची दैनंदिन संख्या कमी प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे उपाहारगृहे, चित्रपटगृहे इत्यादींवर असलेली उर्वरित बंधने चालू मार्च महिन्यात शिथिल करण्याचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना टोपे म्हणाले, निर्बंध उठविण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली असून ते या संदर्भात विचार करतील. करोना संदर्भातील राज्य कृती दलानेही निर्बंध उठविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे चालू महिन्यात निर्बंध आणखी शिथिल होऊ शकतील.
सोमवारी राज्यात ४०७ नवीन करोना रुग्ण आढळले. त्यापैकी ३७ मराठवाडय़ातील आहेत. सोमवारी राज्यातील एकूण सक्रिय करोना रुग्णांची संख्या सहा हजार ६६३ होती. राज्यात आतापर्यंत सात कोटी ७८ लाखांपेक्षा अधिक करोनाच्या प्रयोगशाळा चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ७८ लाख ६६ हजार म्हणजे जवळपास १०.१० टक्के नमुने करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ओमायक्रॉन करोना विषाणूबाधितांची संख्या चार हजार ६२९ आहे. यापैकी चार हजार ४५६ व्यक्तींचा आरटीपीसीआर अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सोमवापर्यंत राज्यात ओमायक्रॉन संसर्ग तपासणीसाठी नऊ हजार ३८२ नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी आठ हजार ३३३ नमुन्यांच्या जनुकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
अशी वक्तव्ये विश्वासार्ह नाहीत
करोना अनुषंगाने संभाजी भिडे यांनी अमरावती येथे डॉक्टरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, डॉक्टर मंडळीच खरी करोना योद्धे आहेत. त्यांच्यामुळेच कित्येकांचे जीव वाचले. करोना विषाणू संसर्ग झालेल्यांपैकी ९८ टक्के रुग्ण डॉक्टरांमुळेच बरे झालेले आहेत. ते खऱ्या अर्थाने देवदूत आहेत. डॉक्टरांच्या उपचारामागे शास्त्र आणि विज्ञान असून त्याची व्याप्ती जगभर आहे. म्हणून भिडे यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर फार भाष्य करण्याची गरज नाही. अशा वक्तव्यांवर लोक विश्वास ठेवत नाही. मागेही त्यांनी आंबा खाल्ल्याने मुले होतात अशा आशयाचे वक्तव्य केले होते, असेही टोपे म्हणाले.