दापोली : खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत गांव कामिनी, वाडीमालदे, विहाळी व वाडीबेलदार या गावांच्या सिमेलगत उभा असलेला किल्ले सुमारगडला जोडणारी लोखंडी शिडीवर दरड कोसळल्याने या किल्ल्यावर जाणारा मार्गच बंद झाला आहे. शासनाचे सध्या या गडाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे. किल्ले सुमारगडकडे जाणा-या सर्व पायवाटा घनदाट जंगलातून जातात. कमीतकमी दोन तास पायी चालून किल्ले सुमारगडला जाता येते. पुर्वी किल्ले सुमारगडला जाणे फारच कठीण होते. परंतु वाडीमालदे गावातील काही दानशूर शिवप्रेमी बांधवांनी या गडावर जाणा-या अवघड दोन ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली होती. यामुळे शिवभक्तांची या गडाकडे मोठ्या प्रमाणावर पावलं वळत होती.

पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पावसामुळे किल्ले सुमारगड येथे लावलेल्या लोखंडी शिड्यांच्या वरच्या टप्प्यावरील दरड कोसळल्याने लोखंडी शिड्या पडल्या असुन शिंड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवघड ठिकाणी पुन्हा लोखंडी शिड्यांची उभारणी करणे जिकीरीचे काम आहे. यासाठी हजोरो शिवभक्तांच्या मदतीची गरज आहे. शासनाने किल्ले सुमारगडच्या डागडुजीच्या कामांकडे विशेष लक्ष देऊन या गडाकडे जाणा-या महत्वाच्या शिवकालीन पायवाटांची तातडीने साफसफाई व डागडुजी करावी अशी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची आग्रहाची मागणी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दापोली विधानसभा कार्यक्षेत्रात किल्ले सुमारगड येत असुन दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्व ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या विकासाकडे राज्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी केली आहे.