सांगली : शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी मोठ्या शहरांत तो पाठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सांगली पॅटर्न’चे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दर्शन एक्सप्रेस रेल्वेच्या खास वाघिणीतून २५ टन पेरू, टोमॅटो, अंडी सोमवारी पहाटे दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांस चांगला दर, तर शहरातील ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे मिळणार आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या ‘सांगली पॅटर्न’ची सध्या चर्चा होत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला व योग्य दर मिळावा यासाठी सांगली पॅटर्न अंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सांगलीत भाजीपाला, फळांचे उत्पादन चांगले होते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याला चांगला दर मिळू शकत नसल्याने दिल्लीची बाजारपेठ जवळ करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी काकडे यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. सांगली जिल्ह्यातील २५ टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली.
मिरज रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी काकडे व समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. प्रायोगिक तत्त्वावर फळे, भाजीपाला पाठविला असून, तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा आठवड्यातून एकदा रेल्वेने पाठविण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व रेल्वे विभागाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.
सांगलीत भाजीपाला, फळांचे उत्पादन चांगले होते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याला चांगला दर मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी अनेकदा निराशा येते. त्यावर मात करण्यासाठी मोठ्या शहरांत तिथल्या गरजेनुसार भाजीपाला, फळे, अंडी पाठवण्याचा ‘सांगली पॅटर्न’ तयार केला आहे. या शेतमालाच्या वितरणासाठी रेल्वे विभागाचे सहकार्य घेतले आहे. – अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली