सांगली : प्रतिकूल स्थितीत क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ढवळी येथील शेतकरी सहदेव यशवंत पाटील यांनी आधुनिक तंत्राचा वापर करत यंदाच्या हंगामात एकरी १४४ टन उसाचे उत्पादन घेतले. याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पाटील यांचे अभिनंदन केले.

मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे. पाटील यांच्याकडे स्वत:ची १५ एकर आणि खंडाने केलेली १० एकर अशी २५ एकर एकूण जमीन आहे. त्यांचे दरवर्षी सुमारे ८-९ एकर ऊसपीक असते. याचे एकरी सरासरी उत्पादन ९० टनापेक्षा जास्त मिळते. गतवर्षी १ एकर क्षेत्रामध्ये हरभरा पिकाचे फेरपालट पीक घेऊन, आडसाली हंगामात २९ जून रोजी को-८६०३२ या जातीची ऊस लावण केली. लावणीपूर्वी नांगरट व रोटर मारून शेतात मेंढीचा कळप बसवला. त्यानंतर एकरी २ ट्रेलर शेणखत विस्कटून पुन्हा नांगरट, रोटर मारून ४.५ फुटावर सरी तयार केली. ऊस लागणीसाठी संशोधन केंद्र, पाडेगांव येथील बेण्यापासून तयार केलेले प्रमाणित बेण्याचा वापर केला.

हेही वाचा : “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लावणीपूर्वी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बेणेप्रक्रिया केली. तसेच वेळोवेळी रसायन खताची मात्राही दिली. दर १५ दिवसांच्या अंतराने विद्राव्य खते, संजीवके यांचा वापर केला. उसाला ४९ ते ५० कांड्या मिळाल्या. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उसाची तोड घेतली. त्यावेळी उसाचे वजन १४४ टन ५९४ किलो भरले.